महाविकास आघाडी सरकारचा वर्षपूर्ती सोहळा; आघाडी सरकारचे चौथे चाक म्हणजे राज्यातील जनता : मुख्यमंत्री ठाकरे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सुरुवातीला तीन चाकांचे सरकार म्हणून टीका झाली. हे तीन चाकांचे सरकार फार काळ टिकणार नाही, असे विरोधक बोलून गेले. पण विरोधकांना हे माहीत नाही की, या सरकाचे चौथे चाक हे जनतेच्या विश्वासाचे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, वर्षभरापूर्वी अनेकांना असे वाटत होते की, हे सरकार अस्तित्वाच येऊच शकत नाही. शिवसेनेला ते गृहीत धरून चालत होते की, शिवसेना फरफटत येणारच. पण शिवसेना कधीही फरफटत जाण्याऱ्या पक्षापैकी आधी नव्हती, उद्याही नसेल आणि कधीच नसणार, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले आहे. राज्यातील महाविकास आघाडीला जनतेचा आशीर्वाद का मिळतोय कारण जनतेला माहिती आहे की, हे सरकार केवळ राजकारण करण्यासाठी एकत्र आलेले नाही. जनतेच्या विश्वासामुळे आपण हा सरकाररूपी रथ पुढे नेऊ शकलो आहोत. सरकारवर जर जनतेचा विश्वासच नसता, तर आपण पुढे चालूच शकलो नसतो. आपल्याला विरोधकांची गरजही पडली नसती, असे ते म्हणाले.

एकत्र आल्यावर आशीर्वादच कमावतो…

आपले तिन्ही पक्ष आणि आपले सहकारी जे अपक्ष म्हणून निवडून आले. हे सर्व वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत. आपल्याला एकमेकांशी संघर्ष करण्याचा खूप अनुभव आहे. एकमेकांशी संघर्ष करत आपण इथंपर्यंत आलो. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की, संघर्ष केल्यानंतर आपण काय गमावतो आणि एकत्र आल्यानंतर आशीर्वाद कसे कमावतो, याचा आपण एक वर्ष अनुभव घेत आहोत. यामागे शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे, असेही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.

… ते राजकारण हे क्लेशदायक

गेले वर्षभर कठीण काळ होता आजही आहे, त्यातून आपण बाहेर पडलेलो नाही. नैसर्गिक आपत्ती ठीक आहे, ती मोठीच असते ती आपल्या हातात नसते. पण काही वेळेला नैसर्गिक आपत्तीतदेखील राजकारण केले जाते हे फार क्लेशकारक असते, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.