नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून चारचाकी वाहनधारकांना फास्टॅग (FASTag) लावण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्र सरकारने देशातील चारचाकी वाहनधारकांना दिलासा दिला आहे.
यापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रत्येक चारचाकी वाहनासाठी १ जानेवारीपासून FASTag बंधनकारक असेल, अशी घोषणा केली होती. एक जानेवारीपासून देशातील टोल नाक्यांवर कॅश व्यवहार होणार नाहीत, फक्त FASTag ग्राह्य धरले जाईल असे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) जाहीर केले होते. पण, आता FASTag साठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
दरम्यान, फास्टॅग अकाउंटमधून टोलचे पैसे वजा झाले की संबंधित वाहनचालकाला त्या संबंधीचा एक एसएमएस त्यांच्या मोबाईलवर येईल. अकाउंटमधील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावे लागणार आहे. फास्टॅगची वैधता पाच वर्षांची असेल. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर नव्याने फास्टॅग खरेदी करावे लागणार आहेत. १५ फेब्रुवारी २०२१ पासून प्रत्येक चारचाकी वाहनाला FASTag बंधनकारक असणार आहे. FASTag ची सक्ती केल्यानंतर वाहनांना टोलनाक्यांवर रोख रकमेने टोल भरावा लागणार नाही. यामुळे वाहनाचं इंधन आणि प्रवाशांचा वेळ दोन्ही गोष्टी वाचतील.
FASTag साठी आवश्यक कागदपत्रे :
– वाहनाचं नोंदणीचं पत्र
– वाहनाच्या मालकाचा फोटो
– KYC साठी आवश्यक कागदपत्र
– वास्तव्याचा दाखला