गुर्‍हाळघरातील उकळत्या रसात उडी मारून तरुणाची आत्महत्या

कोल्हापूर : प्रतिनिधी – कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील पालकरवाडी  येथिल गुर्‍हाळघरातील उकळत्या रसाच्या काहिलीत उडी मारून एका युवकाने आत्महत्या केल्याची माहिती मिळते आहे. हा युवक ९५ टक्के होरपळल्यामुळे या युवकाचा मृत्यू झाला आहे. गौतम मल्लू कांबळे(२२) असे या युवकाचे नाव असून तो करवीर तालुक्यातील तमागाव येथील रहिवासी आहे. हा प्रकार सीसीसीटीव्हीत कैद झाला आहे.

भय्यू महाराज मृत्यू प्रकरण : अश्लिल व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करण्याऱ्या तरुणीसह दोघांना अटक 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गौतम कांबळे हा युवक गेल्या तीन महिन्यांपासून राधानगरी येथील सचिन पाटील यांच्या गुऱ्हाळात जळण टाकण्याचे काम करीत होता. शुक्रवारी नेहमीप्रमाणे काम सुरु होते. पण अचानक गौतम गुऱ्हाळातील रस उकळत आलेल्या काहिलीजवळ आला आणि काही समजण्याच्या आताच त्याने काहिलीत उडी मारली. यावेळी त्याचे इतरही सहकारी देखील  गुऱ्हाळात काम करीत होते. त्यांच्या समोरच गौतमने काहिलीत उडी टाकली.
हा प्रकार पाहताच सहकार्‍यांनी आरडाओरड करून काठ्या, दोरीच्या सहाय्याने त्याला काहिलीतून बाहेर काढले. यामध्ये तो संपूर्णपणे पोळला होता. त्याला गंभीर अवस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो बेशुद्ध होता. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र गौतम मोठ्या प्रमाणात भाजल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, गौतमने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पण काही दिवसांपासून तो निराश होता आणि त्यातूनच त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.