भाजप नेत्याचा गौप्यस्फोट ! उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रत्नागिरीत गुप्त भेट, राजकीय वर्तुळात खळबळ

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीत नुकतीच गुप्त भेट घेतली. माजी खासदार निलेश राणे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यात दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाल्याचे समजतेय. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात राजकीय घडामोडी झाल्याचे आता समोर आले आहे.

निलेश राणे यांनी या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली असा गौप्यस्फोट करताना उदय सामंत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचं नेमकं कारण काय ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून काही राजकीय खलबतं सुरु आहेत का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ऑप्रेशन लोटसची पुन्हा चर्चा

निलेश राणे यांच्या या दाव्यामुळे एकच चर्चा सुरु असून तौक्ते वादळात नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा सोडून उदय सामंत यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची तातडीने भेट घेण्याचं नेमकं कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्यात तीन पक्षांनी महाविकास आघाडीची स्थापना करुन सत्ता स्थापन केली. तेव्हापासून राज्यात ऑपरेशन लोटस सुरु होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे ऑपरेशन लोटससाठी ही भेट झाली का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे येत्या काळात राजकीय भूकंप होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.