मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य पोलीस दलातील रिक्त पद भरतीसाठी पूर्वीप्रमाणेच सामाजिक, आर्थिक दुर्बल घटक (एसईबीसी) प्रवर्ग लागू ठेवण्याचा निर्णय पूर्ववत करण्यात आल्याने मराठा समाजातील इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
बुधवारी यासंदर्भात गृह विभागाने अध्यादेश काढला. २०१९ मध्ये घटकनिहाय शिपाईच्या रिक्त पदांसाठी जाहिरात काढली. त्यात ‘एसईबीसी’ प्रवर्ग होता. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर त्याला अधीन राहून ४ जानेवारीला ‘एसईबीसी’ प्रवर्ग रद्द केल्याचा अध्यादेश जारी केला.
त्यामुळे मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यानंतर ७ जानेवारीला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तो अध्यादेश रद्द केल्याचे जाहीर केले. त्यानुसार, गृह विभागाने भरतीत बुधवारी अध्यादेश जारी केला.