‘देशातील वाढत्या बेरोजगारीला मोदी सरकारचा तो निर्णयच जबाबदार’ – मनमोहन सिंग

पोलीसनामा ऑनलाईन : देशातील वाढत्या बेरोजगारीवरून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मंगळवारी (दि. 2) मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप सरकारने कोणताही विचार न करता 2016 मध्ये घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळेच देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. तसेच असंघटीत क्षेत्रही मोडकळीस आले आहे, असे ते म्हणाले. तसेच मोदी सरकार राज्यांसोबत नियमितपणे विचार-विनिमय करत नसल्याचा आरोपही मनमोहन सिंग यांनी यावेळी केला.

केरळमध्ये राजीव गांधी डेव्हलपमेंट स्टडिजच्या व्हर्च्युअल संमेलनाचे उद्घाटन डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते झाले. सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या तात्पुरत्या उपाययोजनांनी पतपुरवठा समस्या लपवता येणार नाही. या संकटाचा परिणाम लघु आणि मध्यम क्षेत्रावर होऊ शकतो. देशात बेरोजगारी अधिक आहे आणि असंघटीत क्षेत्र ढासळले असून हे संकट नोटबंदीच्या निर्णयामुळे ओढावल्याचेही ते म्हणाले. केंद्र सरकार राज्यांशी नियमितपणे सल्लामसलत करणे याबाबत घटनेत लिहले आहे. परंतु विद्यमान केंद्र सरकार त्याला महत्त्व देत नसल्याचे सिंग म्हणाले. यावेळी त्यांनी केरळच्या विकासावर भाष्य केले आहे. तसेच भविष्यात या ठिकाणी अन्य पर्यायांवरही लक्ष देणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तसेच शिक्षण आणि आरोग्यावर लक्ष दिल्यामुळेच केरळचे लोक देशात आणि जगातील अन्य भागांमध्ये नोकरी मिळवण्यास सक्षम झाल्याचेही ते म्हणाले.