हिजड्याला मुलं होतील, पण सिंचन योजना पूर्ण होणार नाही ; गडकरींची जीभ पुन्हा घसरली  

सांगली : पोलिसनामा ऑनलाईन – काही दिवसांपासून नितीन गडकरींना पंतप्रधान करण्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरु आहेत. यापूर्वी देखील बँकांना चुना लावून गेलेल्या कर्जबुडव्या विजय मल्ल्याची बाजू घेऊन नंतर सारवासारव करणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जीभ पुन्हा एकदा घसरली “एक वेळ हिजड्याला मुलं होतील. मात्र सिंचन योजना पूर्ण होणार नाही, असं आम्हाला वाटलं होतं. मात्र भाजपा सरकारनं सिंचन योजना पूर्ण करुन दाखवली”, असं गडकरी सांगलीतील एका कार्यक्रमात म्हणाले.
सिंचन योजना भाजपाच्या काळातच पूर्ण 

सांगली येथील शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना ते सिंचन विषयी बोलत होते. पण हे बोलत असताना मात्र गडकरींची जीभ पुन्हा घसरली. टेंभू सिंचन योजनेविषयी बोलताना गडकरींनी वादग्रस्त विधान केलं. ‘टेंभू योजना अनेक वर्षांपासून अर्धवट होती. ही योजना कधी पूर्ण होईल, असं आम्हालादेखील वाटलं नव्हतं. खरंतर हे इथे बोलू नये. पण बोलतो. एकवेळ हिजड्याचं लग्न झालं तर त्याला मुलं होतील. पण सिंचन योजना पूर्ण होणार नाही.

मात्र भाजपा सरकारच्या काळात ही योजना पूर्ण झाली. शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण झालं. टेंभूसारख्या अनेक महत्त्वाच्या आणि महत्त्वाकांक्षी योजना भाजपा सरकारच्या कार्यकाळात पूर्णत्वास गेल्या,’ असं गडकरी म्हणाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट उपस्थित होते.

शेतकरी मेळाव्यात गडकरींनी रखडलेल्या सिंचन योजनांवर भाष्य केलं. टेंभू सिंचन योजना अनेक वर्षांपासून रखडल्या होत्या. टेंभूसारख्या अनेक योजना पूर्णत्वास जात नव्हत्या. या योजना कधी पूर्ण होतील, असं आम्हालादेखील वाटलं नव्हतं. मात्र केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीस सरकार असताना अनेक योजना मार्गी लागल्या. त्यामुळे दुष्काळाची दाहकता कमी झाली, असं गडकरींनी सांगितलं.