राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार ? वाढत्या कोरोनावर मुख्यमंत्र्यांचे 6 मोठे निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मध्यंतरीच्या काळात राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असताना मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली.

या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय, टास्क फोर्सचे सदस्य आदी उपस्थित होते.

बैठकितील महत्त्वाचे मुद्दे
1. पोलिसांनी शिथिलता न दाखवता दंडात्मक कारवाई करावी
लॉकडाऊन पाहिजे की नाही थोड्या निर्बंधासह मोकळेपणाने राहयचे हे जनतेने ठरवायचे आहे. लोक मास्क घालत नसल्याचे किंवा आरोग्याचे नियम पाळत नसतील तर जिल्हा आणि पोलीस प्रशासन यांच्यावर हे नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी आहे. त्यांनी अजिबात शिथिलता न दाखवता दंडात्मक व आवश्यक कारवाई करावी.

2. कोरोना वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा
कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा. एकेका रुग्णांचे किमान 20 तरी संपर्क शोधलेच पाहिजेत, असे आदेश देण्यात आले आहे. सर्व व्यवहार सुरु झाले असून तरुण वर्ग घराबाहेर पडला आहे. कोरोना संपला आहे असे वागले जात आहे. याचा परिणाम घरातील वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना आपण धोक्यात आणत आहोत. मधल्या काळात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम राज्यात राबवली. यातील सह व्याधी रुग्णांची परत आरोग्य कर्मचाऱ्यांनी विचारपूस सुरु करावी.

3. त्या संघटनांना बोलावून मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यास सांगा
ज्या ज्या व्यावसायिक संस्था, संघटना लॉकडाऊन उठविण्यासाठी आपणाकडे येत होत्या त्या सर्व संबंधित संस्था, संघटना यांच्याशी परत एकदा बोलून एसओपीची काटेकोर अंमलबजावणी होईल याची खात्री करुन घ्यावी. तसेच जिथे कंटेनमेंट आवश्यक आहे तिथे ते करा व त्याची अंमलबजावणी करा.

4. स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी तात्काळ कारवाई करावी
मागील वर्षभर आपण कोरोनाशी लढताना विविध क्षेत्रासाठी नियम ठरवले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. हे गंभीर आहे. खास करून इतके दिवस थांबलेले लग्न समारंभ पुन्हा सुरु झाले आहेत. लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या व इतर सामाजिक कार्यक्रम कुठल्याही आरोग्याच्या नियमाविना होत असल्याचे आढळून येत आहे. हॉटेल, उपहागृहांच्या वेळा वाढवल्या असताना याठिकाणी नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी अशा सर्व ठिकाणी भेटी देऊन तात्काळ कारवाई करावी.

5. त्या सभागृहांवर परवाने रद्द करण्याची कारवाई करा
विवाह किंवा इतर समारंभात मास्क व इतर नियम पाळले जात नसल्याचे आढळून आल्यास त्या हॉल्स किंवा सभागृहांवर परवाने रद्द करण्याची कडक कारवाई करा. लोकांमध्ये बेफिकिरी आली असली तरी स्थानिक प्रशासन व पोलिसांत कर्तव्यात ढिलाई नको.

6. गावागावात फिरत्या वाहनाद्वारे चाचण्या वाढवा
हॉटेल, उपहारगृह यांना वेळ वाढवून दिली असताना देखील ते नियमांचे पालन करत नसतील तर त्यांच्यावर लगेच कडक कारवाई करी. सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी नियमितपणे करावी. तसेच गावागावात जाऊन फिरत्या वाहनाद्वारे लोकांच्या चाचण्या करा. उभारण्यात आलेल्या फिल्ड हॉस्पिटलमधील सर्व यंत्रणा व्यवस्थित सुरु आहे का याची खात्री करा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.