टीम इंडियाच्या ‘त्या’ ऐतिहासिक कामगिरीला आज 10 वर्षे पूर्ण, तुम्हाला आठवला का?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   १९८३ साली कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषक जिंकला होता. त्याची पुनुरावृत्ती करत २ एप्रिल २०११ साली मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाने इतिहास रचला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आजच्या दिवसाला विशेष असं महत्व आहे. दहा वर्षापूर्वी, आजच्याच दिवशी टीम इंडियाने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली क्रिकेट विश्वचषकावर पुन्हा एकदा, तब्बल २८ वर्षानंतर आपलं नाव कोरलं होतं.

सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी सचिनला खांद्यावर घेऊन मैदानात मारलेली ती रपेट आजही अनेकांच्या लक्षात आहे. सचिनसाठी आपण वर्ल्ड कप जिंकला अशी भावना युवराज सिंहने व्यक्त केली तर सचिनने गेली २१ वर्षे देशाची ओझं स्वत: च्या खांद्यावर पेललं, त्यामुळे आपण आता त्याचं ओझं पेलत आहोत, अशी भावना विराट कोहलीने व्यक्त केली होती.

भारत आणि श्रीलंकेमध्ये झालेला सामना अनेकांच्या आजही लक्षात आहे. श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकाराने टॉस जिंकला आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. माहेला जयवर्धनेने शतक झळकावत डावाला आकार दिला. तसेच कुमार संगकारानेही ४८ डावांची खेळी केली. श्रीलंकेने विजयासाठी भारतासमोर २७५ धावांचं लक्ष ठेवलं होतं. हे लक्ष गाठताना टीम इंडियाचे सेहवाग आणि सचिन लवकर बाद झाले. गौतम गंभीरने डाव सावरत ९७ धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर आलेल्या धोनीने नाबाद ९१ आणि युवराजने नाबाद २१ धावांची खेळी करत ४९ व्या षटकात विजयावर शिक्कामोर्तब केलं.