पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक : पाकचे 12 बंकर्स उद्ध्वस्त, 5 रेंजर्संना कंठस्नान

श्रीनगर : वृत्तसंस्था- सर्जिकल स्ट्राईकनंतर आता भारतीय लष्कराने जम्मू आणि काश्मीर सीमारेषेवर पाकिस्तानी सैन्यावर  मोठी कारवाई केली आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानचे अनेक बंकर्स उद्ध्वस्त केले आहेत. याशिवाय पाकिस्तानचे 5 जवानही ठार करण्यात आले आहेत. यालाच मिनी सर्जिकल स्ट्राईक असेही म्हणण्यात येत आहे. कारण सर्जिकल स्ट्राईकनंतरची ही भारतीयने लष्कराने केलेली सर्वात मोठी कारवाई आहे.

पाकिस्तानकडून सीमारेषेवर काही ना काही कुरापती करण्याच्या हेतूने अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन होताना दिसून येते. असे असले तरी भारतीय लष्कराने या कुरापतींना नेहमीच चोख प्रत्युत्तर दिले आहे. असेच प्रत्युत्तर आताही देण्यात आले आहे. पाकिस्तानचे पाच जवान  पुंछ आणि राजौरी क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न करत होते. परंतु भारतीय लष्कराने हा प्रयत्न उधळून लावला. घुसखोरी करणाऱ्या पाचही पाकिस्तानी जवानांना भारतीय सैन्याने कंठस्नान घातले आहे. इतकेच नाही तर, पाकिस्तानचे 12 बंकर्सही भारतीय सैन्याने उद्धवस्त केले आहेत.

लष्करी कारवाईचे अधिकारी रणबीर सिंग यांनी या कारवाईविषयी माहिती दिली आहे. इतकेच नाही तर ही माहिती देताना, पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यास इंडियन आर्मी नेहमीच तयार आहे, असेही सिंग यांनी म्हटले आहे.