धक्कादायक माहिती ! २०२५ पर्यंत ७.५० कोटी नोकऱ्या जाणार, तुमची नोकरी असेल का सुरक्षित ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ही नवीन शाखा विकसित होत आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्समुळे तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणं खूप सोपं होणार असलं तरी त्यामुळे काही मूलभूत समस्याही निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्समुळे मशीन्सची कार्यक्षमता वाढेल, त्यामुळे मात्र अनेकांना आपली नोकरी गमवावी लागेल. यामध्ये विशेषत डेटा एंट्री करणाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकते. मात्र असे जरी असले तरी साॅफ्टवेअर इंजिनियर्स आणि मार्केटिंगमधल्या नोकऱ्यांमध्ये वाढ होईल. वर्ल्ड इकाॅनाॅमिक फोरमचा (WEF) ने याबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

वर्ल्ड इकाॅनाॅमिक फोरमचा (WEF) ने अहवालात म्हंटले आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे उत्पादन क्षमता वाढते. सगळी कामं कम्प्युटर आणि रोबो करत असतील तर चुकाही कमी होतील. येणाऱ्या ७ वर्षांत म्हणजे २०२५ पर्यंत माणसाची अर्धी कामं मशीन्स करतील. आता माणसाची कामं २९ टक्के मशीन्स करतात. पुढे अख्ख्या जगात ७.५० कोटी लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागतील. पण चांगली गोष्ट हीसुद्धा आहे की मशीन्स आल्यनं १३. ३ कोटी नव्या नोकऱ्या मिळतील. बाजारात ५. ८ कोटी जास्त नोकऱ्या उपलब्ध होतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे लोकांकडे जास्त डिव्हाइस असतील. त्यामुळे कस्टमर सर्विस देणाऱ्यांची गरज जास्त वाढेल. जी मशीन्स तयार होतील, ती विकण्यासाठी सेल्स आणि मार्केटिंगची गरज लागेल. आर्टस आणि कल्चर क्षेत्रात मागणी वाढल्यानं गायन, नृत्य, चित्रकला, सिनेमे बनवणं या क्षेत्रातले रोजगार कमी होणार नाही. मात्र त्यासाठी तुम्हाला नव्या काळाप्रमाणे तुमच्यात बदल करावे लागतील. नव्या गोष्टी शिकाव्या लागतील.

या नोकऱ्यांमध्ये होईल वाढ –
‘लिंक्डइन’ने दिलेल्या माहितीनुसार की साॅफ्टवेअर इंजिनियर्स आणि मार्केटिंगमधल्या नोकऱ्यांमध्ये वाढ होईल. डेव्हलपर्स, ई काॅमर्स आणि सोशल मीडिया स्पेशॅलिस्टना मागणी वाढेल. वेब आणि साॅफ्टवेअर डेव्हलपर्स यांना सुवर्णसंधी असेल.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स –
आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संगणक्षेत्रात नवीन शाखा विकसित होत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे मानवी बुद्धिमत्तेसारखी अनुभवातून शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये व त्या चालवण्याऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये आणणे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे वेगवेगळ्या क्षेत्रांतील हे सर्व पर्याय आता भारतातही उपलब्ध होत आहेत. यामुळे तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणं खूप सोपं होणार असलं तरी त्यामुळे बेरोजगारी, आर्थिक मंदीच्या दुष्टचक्राची पुन्हा सुरुवात तर होणार नाही ना.. ही चिंता नव्याने सतावू लागली आहे.

सध्या सीसीटीव्ही कॅमेरा, इमेज प्रोसेसिंग, वाहने, घरगुती कामे, क्लीनिंग, स्मार्ट होम्स यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होतो. हे क्षेत्र माहिती तंत्रज्ञानापुरतेच मर्यादित न राहता रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास व भाषा यांच्या अभ्यासक्रमातही शिरला असल्याने सध्या याचे शिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे.