राज्याच्या तिजोरीत ‘चणचण’ पण तरीही 90 कोटींची ‘उधळण’ !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यामुळे राज्याची आर्थिक घडीच विस्कटली गेली. अनेक विकास कामे निधीअभावी रखडली. एकूणच राज्यातील आर्थिक स्थिती बिकट असताना दुसरीकडे मात्र मंत्र्यांची मंत्रालयातील दालने आणि त्यांच्या बंगल्यांवर गेल्या वर्षभरात तब्बल ९० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गतची रस्त्यांची कामे निधीअभावी ठप्प आहेत. अनेक कंत्राटदारांची देयके अडली आहेत, पण मंत्र्यांचे बंगले आणि दालनांमध्ये केलेल्या कामाची देयके मात्र कंत्राटदारांना तत्परतेने दिली जात आहेत. मंत्र्यांच्या बंगल्यांची कामे ९० टक्के पूर्ण झाली आहेत.कोणत्या बंगल्यांवर किती खर्च करण्यात आला याची यादी बघितली असता, मंत्र्यांच्या बंगल्यांना कोरोना वा आर्थिक संकटाची कोणतीही झळ बसली नसल्याचे स्पष्ट होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगला (३ कोटी २६ लाख), उपमुख्यमंत्री अजित पवार (देवगिरी -१ कोटी ७८ लाख), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (रॉयलस्टोन -२ कोटी २६ लाख), सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण (मेघदूत – १ कोटी ४६ लाख), सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (चित्रकूट -३ कोटी ८९ लाख), उद्योगमंत्री सुभाष देसाई (शिवनेरी -१ कोटी ४४ लाख), अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (रामटेक – १ कोटी ६७ लाख), उच्च व तंत्रशिक्षणमंत्री अमित देशमुख (बी ३ – १ कोटी ४० लाख), पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (सातपुडा – १ कोटी ३३ लाख), नितीन राऊत (पर्णकुटी – १ कोटी २२ लाख) असे काही बंगल्यांवरील खर्चाचे आकडे आहेत. सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अग्रदूत व नंदनवन असे मलबार हिलवरील आजूबाजूचे दोन बंगले आहेत आणि त्यांच्यावरील खर्चाचा एकूण आकडा २ कोटी ८० लाख रुपये आहे.

दुरुस्तीवर महागड्या सामुग्रीचा वापर
आपल्या बंगल्यात महागड्या सामुग्रीचाच (जसे इटालियन मार्बल आदी) वापर करा, असा दबाव मंत्री वा त्यांचे पीए, पीएस आणतात असा बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचा नित्याचा अनुभव आहे. मंत्र्यांच्या दालनातही महागड्या सामुग्रीचा वापर करण्यात आला आहे. एकूण काय तर दुरुस्तीच्या नावाखाली बहुतेक बंगले चकाचक करण्यात आले आहेत