Thackeray sarkar चे दिवाळीनंतर ‘फटाके’ वाजणार, राणेंचा सूचक इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लवकरच दिवाळीनंतर ठाकरे सरकारचे (Maharashtra government) फटाके वाजतील असा सूचक इशारा भाजपचे खासदार नारायण राणे ( BJP leader Narayan Rane ) यांनी दिला आहे. पण फटाक्याचे स्वरूप कसे असेल ते आत्ताच काही सांगता येणार नाही, योग्य वेळ आली की सांगणार, असा इशाराही राणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिला.

राणे म्हणाले, मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत. या सरकारला काहीही जमत नाही. सरकारचे सध्या फक्त हात धूणे सुरू असून, भ्रष्टाचार जोरात सुरू आहे. राज्याची आर्थिक स्थिती रसातळाला गेली आहे. फक्त योजना बंद करा आणि नवे टेंडर काढा हे प्रकार सुरू आहेत. यांचे हे काम फार काळ चालणार नाही. आमचे सरकार आले की यांच्या सर्वच व्यवहारांची चौकशी करू, असेही त्यांनी सांगितले. बिहारमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतरही शिवसेना दुसऱ्यांना सल्ले देत आहे. यांना बोलण्याचा काहीही अधिकार नाही असेही ते म्हणाले. लोकांनी भाजपला स्वीकारले असून आमचे कायमचे ‘मॅन ऑफ दी मॅच’ हे नरेंद्र मोदीच आहेत. मोदींच्या करिष्म्यामुळेच भाजपला यश मिळाले आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी मेहनत घेतली त्याचे फळ म्हणजे बिहारमधली निवडणूक आहे.

दरम्यान, अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis) यांनीही शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. बिहार विधानसभेतल्या निकालांवरून (Bihar assembly result) त्यांनी शिवसेनेवर सर्वांत मोठा हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ असा करत शवसेनेने आपल्याच साथीदारांना बिहारमध्ये ठार मारले अशी टीका त्यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या एका मुलाखतीचा आधार घेत त्यांनी हा हल्लाबोल केला आहे.