आधी घड्याळाचे बटण दाबा मगच तक्रार करा : अजित पवार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे पोहचली आहे. पाथर्डी येथील जाहीर सभेत एका शेतकऱ्याने पैसे मिळत नसल्याची तक्रार अजित पवारांकडे केली. पैसे मिळत नाही अशी तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याला आधी घड्याळाचे बटण दाबा असं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी दिलं.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेत अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे पवार बोलत होते. शेतकऱ्याने पैसे मिळत नसल्याची तक्रार अजित पवारांकडे केली. त्यावर अजित पवार म्हणाले की ,’आधी घड्याळाचे बटण दाबा. घड्याळाचे बटण दाबायचे नाही आणि आम्हाला पैसे का मिळाले नाही म्हणून आम्हाला विचारता. अहो त्या कमळाबाईला विचारा ना.’

सभेत बोलताना पवारांनी अनेक मुद्द्यांवर सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफी कशी झाली पाहिजे… तर दोन महिन्यात कर्जातून शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे परंतु आज तसे होत नाही. नुसती पोकळ आश्वासनं, गाजरं दाखवून उपयोग नाही त्यासाठी काम केलं पाहिजे असा टोला अजित पवार यांनी लगावला.

शेतकऱ्यांच्या मुळावर का उठला आहात – चारा छावण्यांबाबत सरकारने काढलेला जीआर विषयी बोलताना पवार म्हणले की, ‘एखाद्या शेतकर्‍याकडे पाच सहा गुरे आहेत मग पाचच्या वर गुरे असतील तर शेतकऱ्यांनी बाकीची गुरं कुठे न्यायची. म्हणजे यांचे मंत्री राम शिंदे यांनी सांगितले तसे पाहुण्यांकडे गुरे नेऊन बांधायची असेच सरकार करायला लावत आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर का उठला आहात. तो सर्वांना जगवतोय. मंत्र्यांचे कारखाने आहेत त्यांनी एफआरपी दिली का. हे कुठल्या तोंडानी सांगणार आहात असा सवाल अजित पवारांनी विचारला. या सरकारची थापेबाजी सुरु आहे. चुकीचे आदेश काढत आहेत हे वेळीच ओळखा. कसल्या लाल पिवळ्या याद्या काढता. हा सिग्नल आहे का लाल, पिवळा, हिरवा दिसला की थांबा आणि जावा हे काय चाललं आहे असा संतप्त सवालही अजितदादा पवार यांनी विचारला.

जलयुक्त शिवार कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप – पुढे बोलताना त्यांनी जलयुक्त शिवारच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली. जलयुक्त शिवाराने हजारो गावे टँकरमुक्त झाली आहे असं सांगत आहेत. कुठे झाली आहेत दाखवा. आज पाथर्डी, शेवगावमध्ये १२३ गावात टँकरने पाणी का दिले जात आहे उत्तर द्या. या जलयुक्त शिवार कामात भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केला.