अरुण जेटलींच्या निधनानंतर रिपब्लिक अन् अर्णब गोस्वामींसाठी विजयाच वातावरण, WhatsApp चॅटमधील आणखी एक धक्कादायक माहिती समोर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधील माहिती लीक झाल्यामुळे अनेक नवनविन माहिती समोर येऊ लागली आहे़ अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्अ‍ॅप चॅटमध्ये काही मंत्र्यांबाबत आक्षेपार्ह विधाने असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर अरुण जेटली यांच्या निधनाच्या वृत्तानंतर रिपब्लिक भारत हिंदी टीव्हीत विजयाच्या सेलिब्रेशनसारखं वातावरण होतं, हे या व्हॉट्सअप चॅटमधून सिद्ध होतंय, असे वृत्त नवभारत टाइम्सने दिलंय. दरम्यान, गोस्वामी यांच्या पत्रकारितेवर यापूवीर्ही अनेकांनी भाजपाधारित असल्याचा आरोप केला होता. आता, व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल झाल्याननंतर पुन्हा एकदा अर्णब गोस्वामी यांच्या पत्रकारितेला आणि रिपब्लिक टीव्हीवर टीका करण्यात येत आहे.

लीक झालेल्या व्हॉट्स अ‍ॅप चॅटच्या आधारावरून अर्णब गोस्वामी यांना बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकची कुणकूण आधीच लागली होती. असा दावा करण्यात आला आहे. १४ फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. मात्र हा हल्ला होण्यापूर्वी दोन-तीन दिवस आधीच काहीतरी मोठे घडणार असल्याची माहिती आपल्या चॅटमधून दिली होती. मिळत असलेल्या माहितीनुसार २३ फेब्रुवारीच्या चॅटमध्ये अर्णब गोस्वामी यांनी काहीतरी मोठे घडणार असल्याची माहिती पार्थो दासगुप्ता यांना दिली होती.

दरम्यान, अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या संवादात केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांचा उल्लेख निष्क्रिय असा करण्यात आला आहे. समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या संभाषणात सर्व मंत्री आपल्याबरोबर आहेत, अशा शब्दांत गोस्वामी यांनी पार्थ यांना दिलासा दिल्याचे समोर आले आहे. अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील संवाद समोर आल्यानंतर सोशल मीडियावर टीकेचा भडीमार करण्यात आला. हाच विषय ट्रेडिंगवरही होता, अशी माहिती मिळाली आहे.