केजरीवालांकडून आगीच्या घटनेचे चौकशीचे आदेश, प्रत्येकी 10 लाख रूपये मदत जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीतील ‘अनाज मंडी’मध्ये लागलेल्या आगीत आतापर्यंत ४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. अद्याप २० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून समजते की मृतांची संख्या अजून वाढू शकते. आतापर्यंत ५९ लोकांची सुटका करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या घटनेची माहिती घेण्यासाठी ‘फिल्मिस्तान’मध्ये पोहोचले असून मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. तसेच जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये देण्याची घोषणा देखील त्यांनी केली. धान्य बाजारामध्ये माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, “मी मॅजिस्ट्रेट इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत आणि सात दिवसात अहवाल देण्यास सांगितले आहे.”

घटनेचा केला जाणार तपास, दोषींवर होणार कारवाई
दिल्लीचे खाद्यपदार्थ व नागरिक पुरवठा मंत्री इमरान हुसेन यांनी या घटनेवर रविवारी बोलताना सांगितले की, या घटनेचा तपास खोलवर जाऊन तपास करण्यात येईल आणि दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येईल. त्यांनी ट्विट केले की, ‘ही दु: खद घटना आहे. घटनेचा तपास केला जाईल आणि त्याबरोबरच या घटनेस जो कुणी जबाबदार असेल त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाईल.’

दिल्लीतील सर्वात मोठे रेस्क्यू ऑपरेशन
या आगीत जखमी झालेल्या लोकांचा हिंदू राव रुग्णालय, आरएमएल, लेडी हार्डिंग आणि एलएनजेपी या रुग्णालयांमध्ये उपचार चालू आहे. घटनास्थळावर एनडीआरएफचे पथक पोहोचले असून मिळालेल्या माहितीनुसार, आग लागण्याची ही घटना बॅग बनवणाऱ्या एका कारखान्याला लागली आहे. नेमकी आग कोणत्या करणामुळे लागली हे अद्याप समोर आलेले नाही. सांगितले जातेय की या आगीत जास्त करून लोकांचा मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे झाला आहे. अग्निशमन दलाने सांगितले की दिल्लीमधील आतापर्यंतचे हे सर्वात मोठे रेस्क्यू ऑपरेशन आहे.

पाच मजली इमारतीत हा कारखाना चालत असे
आगीत पीडित व्यक्तींना उपचारासाठी एलएनजेपी हॉस्पिटल येथे आणण्यात आले आहे. येथे कुटुंबातील सदस्यांची गर्दी वाढली आहे. त्यांनी सांगितले की डॉक्टरांची संपूर्ण टीम जखमींवर उपचार करण्यात व्यस्त आहे. त्याच वेळी सांगण्यात येत आहे की अरुंद रस्त्यांमुळे रुग्णवाहिकेला घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, जी इमारत पेटली होती, ती यामीन या व्यक्तीच्या नावावर आहे. त्यात अनेक कारखाने चालतात. त्यांच्यात काम करणारे मजूर याच इमारतीत झोपतात. ही एकूण पाच मजली इमारत असून साडेचारच्या सुमारास ही आग लागली होती.

Visit : Policenama.com