…अन् औरंगाबादचे झाले छत्रपती संभाजीनगर, मनसैनिकांनी अनोखे आंदोलन करत दाखवले धाडस

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्यावरून राज्यातील वातावरण तापल आहे. भाजपाकडून नामकरणाच्या मुद्द्यावर जोर दिला जात आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून नामांतराला विरोध होत आहे. राष्ट्रवादीनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बसपा, सपा असे सर्वच पक्ष आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. असे असताना मनसेने मात्र अनोखे आंदोलन करत धाडस दाखवले आहे. नगर शहरातील तारकपूर बसस्थानकावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादला जाणाऱ्या एसटी बसवर “छत्रपती संभाजीनगर’ नावाचे फलक चिटकविले आहे. याची दखल घेऊन लवकरात लवकर नामांतर करावे, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी वर्मा म्हणाले, औरंगाबादच्या नामांतरणाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत केंद्र व राज्य सरकारही बोटचेपीची भूमिका घेत आहे. नागरिकांच्या भावनांचा विचार करता संभाजीनगर हे नाव होणे गरजेचे आहे. आज अनेक योजनांना, चौकांना सत्ताधारी व विरोधक आपआपल्या नेतृत्वाचे नाव देत आहेत. परंतु, नागरिकांच्या भावनांचा आदर करून छत्रपती संभाजीनगर’ हे नामांतर होणे गरजेचे आहे.

या बाबत मनसेने वेळोवेळी पाठपुरवठा केला. परंतु, त्याबाबत कोणताही निर्णय होत नाही. म्हणून आज नगरमध्ये औरंगाबादला जाणाऱ्या गाड्यांवर छत्रपती संभाजीनगर’ नावाचे फलक चिकटविले आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, अनिकेत शियाळ, संकेत जरे, सुमित शिर्के, हामजा शेख, दीपक मगर, योगेश चंगेडिया, प्रमोद जाधव आदी मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.