भाजपच्या रोजच्या आश्वासनांनी जनता कंटाळली : काॅंग्रेस आमदार भाई जगताप

दापोली : पोलीसनामा आॅनलाइन – देशामध्ये भाजपा सरकारने हाहाकार माजवला असून रोजच्या आश्वासनांना जनता कंटाळली आहे. जनतेचा हा त्रास दूर करण्यासाठी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र घेऊन काँग्रेसप्रणीत सरकार देशात व राज्यात येण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कार्यकर्त्यांनीही आघाडीचा धर्म पाळावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रांतिक उपाध्यक्ष आ.भाई जगताप यांनी दापोली येथे केले.

दापोली शहरातील चैतन्य सभागृहात काँग्रेसचे दापोली तालुकाध्यक्ष भाऊ मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा एक मेळावा नुकताच घेण्यात आला. या मेळाव्याला आ. हुस्नबानू खलिफे, प्रदेश प्रवक्ते हरिष रोग्ये, जिल्हा सरचिटणीस सुरेश कातकर, मंडणगड तालुकाध्यक्ष मुश्ताक मिरकर, खेड तालुकाध्यक्ष गौस खतिब, महामुद पालेकर, संतोष मांडरे, अस्मिता केंद्रे, विठाबाई कदम, संतोष शिर्के, सिराज रखांगे, उपनगराध्यक्ष रजिया रखांगे, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष अविनाश मोहिते, तालुका सरचिटणीस मंगेश मोरे, दिनेश बोरजे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ. भाई जगताप म्हणाले की, दापोली तालुका काँग्रेसमध्ये काही काळ मरगळ आली होती. मात्र तालुकाध्यक्षपदी भाऊ मोहिते यांची निवड झाल्यानंतर त्यांनी ही मरगळ झटकून टाकून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी मेळावा घेतला आहे. त्यानंतर विविध गावांमध्ये जाऊन ते ग्रामकमिटी स्थापन करणार असून काँग्रेसला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी भाऊ मोहिते प्रयत्नशील असतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त करतानाच वरिष्ठ पातळीवरून संपूर्ण पाठिंबा देण्याचे सूतोवाच केले.

भाजपवर टीका करताना भाई जगताप म्हणाले की, पंतप्रधानांच्या खांद्यावर उद्योगपती हात ठेवतात. एवढे देशाला मोदींनी लाचार केले असून मोदी केवळ १० ते १२ उद्योगपतींसाठी काम करत असून जेव्हा देशामध्ये मोदी जनतेला सामोरे जातील तेव्हा लोक त्यांना धडा शिकवतील. मुस्लिम समाजाला आमची सत्ता आल्यावर आरक्षण देणार असल्याचे सांगतानाच राज्यामध्ये १९ मंत्री हे भ्रष्टाचारी असून फडणवीस त्यांना पाठीशी घालत असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘राडेबाजी’ हाच राणेंच्या स्वाभिमान पक्षाचा अजेंडा : शिवसेना आमदार