Vodafone-Idea, Airtel च्या ग्राहकांना आता ‘या’ प्लॅन्ससाठी द्यावे लागू शकतात जास्त पैसे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारती एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या टेलिकॉम कंपन्या त्यांच्या टेरिफ प्लॅनची किंमत वाढवण्याच्या विचारात असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीला सुत्रांनी दिली आहे. काही निवडक डेटा आणि कॉलिंग प्लॅन्सच्या किंमतीमध्ये 10 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा विचार या कंपन्या करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ही वाढ सप्टेंबरच्या सुरुवातीला किंवा ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. भारत सरकारला दिला जाणारा ॲडजेस्टेड ग्रॉस रेव्हेन्यूची परतफेड करण्यासाठी कंपन्यांनी ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी एजीआरच्या थकबाकीबाबत कोर्टाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर एअरटेल आणि वोडाफो-आयडियाने आधीच दरवाढ केली आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयात या टेलिकॉम कंपन्यांच्या नव्या याचिकेवर आज तीन वाजता निर्णय होण्याची शक्यता आहे. न्ययमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील न्यायाधीश खंडपीठाने थकबाकी वसूल करण्याबाबत टेलिकॉम कंपन्यांना काही सवलत दिली जाईल की नाही याबाबत आपला निर्णय जाहीर करणे अपेक्षित आहे.

परंतु एका मिडियाच्या अहवालानुसार, टेलिकॉम कंपन्यांवर आकारण्यात आलेल्या एकूण थकित रकमेच्या निर्णयांवर सर्वोच्च न्यायालय पुनर्विचार करणार नाही. कारण या कंपन्यांनी थकबाकी भरण्यासाठी वीस वर्षांचा कालावधी मागितला आहे. यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, भारत सरकारच्या दूरसंचार विभागात काही सिक्युरिटीज आहेत. ज्यामुळे या टेलिकॉम कंपन्या त्यांच्या कर्जाची परतफेड सुनिश्चित करतात.

दरम्यान, 2019 मध्ये भारतातील सर्व टेलिकॉम ऑपरेटरंनी विविध योजनांमध्ये 10 ते 40 टक्क्यांच्या दरम्यान दरवाढीची घोषणा केली होती. एका मीडिया रोपोर्टनुसार, महसूल प्रवाह कायम ठेवण्यासाठी शुल्क वाढवणे अपरिहार्य आणि आवश्यक असल्याचे म्हटले आहे.