भद्रावतीत बुधवारपासून 5 दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ !

भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन – भद्रावती शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून संक्रमण आणि रुग्णांची संख्या कमी करण्याकरीता कोरोना विषाणूंची साखळी तोडणे गरजेचे आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भद्रावती शहरातील समस्त व्यापारी संघटनेने भद्रावती शहरात बुधवार दि.१६ सप्टेंबर ते रविवार दि.२० सप्टेंबर पर्यंत स्वयंस्फुर्तीने ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात व्यापारी संघटनेने दि. १४ सप्टेंबर रोजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, तहसीलदार महेश शितोळे आणि भद्रावती पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार सुधीर वर्मा यांना एक निवेदन सादर करुन भद्रावतीत व्यापारी संघटना जनता कर्फ्यू पाळत असल्याचे अवगत केले. तसेच शासन व प्रशासनाला सहकार्य म्हणून वरील उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर जनता कर्फ्यू ५ दिवसांचा असून त्यानंतर वाढवायचा की थांबवायचा याचा निर्णय त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार घेण्यात येणार आहे.

निवेदनाची प्रतिलिपी आ. प्रतिभाताई धानोरकर यांना सादर करण्यात आली आहे. नगराध्यक्ष आणि ठाणेदारांना निवेदन सादर करतेवेळी प्रकाश पाम्पट्टीवार, प्रवीण महाजन, निलेश गुंडावार, बाळू गुंडावार, अब्बास अजानी, संतोष आमने उपस्थित होते.