तेजस्वींच्या नावामुळं महाआघाडीत ‘गदारोळ’, शरद यादवच मुख्यमंत्री पदाचा ‘चेहरा’, 3 पक्षांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणूकीनंतर बिहार विधानसभा निवडणूकीची तयारी सुरु झाली आहे. शुक्रवारी पटनामध्ये महागठबंधनासाठी बैठक पार पडली. महागठबंधनमधील नेत्यांनी तेजस्वी यादव यांना आपला नेता मानण्यास नकार दिला आणि शरद यादव यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार बनवण्याची मागणी केली.

शुक्रवारी झालेल्या बैठकीत जीतन राम मांझी, उपेंद्र कुशवाहा, मुकेश साहनी यांनी पटनामध्ये लोकतांत्रिक जनता दल प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांना सीएम पदाचे उमेदवार बनवण्याची मागणी केली. या बैठकीत काँग्रेसने आरजेडीच्या कोणत्याही नेत्याला आमंत्रण दिले नाही.

उपेंद्र कुशवाहा आणि मुकेश साहनी यांनी आरजेडी नेता तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनाचे नेता होण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. महागठबंधनातील अनेक नेते यामुळे नाराज आहेत. आरजेडीने एकतर्फी निर्णय घेत तेजस्वी यांना महागठबंधनाचा नेता आणि मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केले. त्यांचे म्हणणे आहे की तेजस्वी यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवण्यासाठी महागठबंधनच्या कोणत्याही दलाशी विचार विमर्श केलेला नाही.

आज झालेल्या बैठकीनंतर जीतन राम मांझी म्हणाले की बैठकीत जो काही निर्णय झाला त्याची माहिती शनिवारी शरद यादव एका पत्रकार परिषदेत देतील. जीतन राम मांझी म्हणाले की आमची बैठक पुन्हा एकदा होईल.

तेजस्वींना आशीर्वाद देणार शरद –
या बैठकीनंतर आरजेडी प्रवक्ता मृत्यूजंय तिवारी म्हणाले की शरद यादव वरिष्ठ नेता आहेत आणि ते तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनण्यासाठी आशीर्वाद देतील. तिवारी म्हणाले की महागठबंधनमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा तेजस्वी यादव आहे आणि याबाबत कोणत्याही पक्षाचे दुमत नसायला हवे.

आरजेडीने लॉन्च केले कॅंपेन –
महागठबंधनने निवडणूकीची तयारी सुरु केली आहे आणि दुसरीकडे आरजेडीने कॅंपेनला जोरदार सुरुवात केली आहे. लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांनी काही दिवसांपूर्वी पोस्ट केली होती, ज्यात नव्या कॅंपेनबद्दल सांगितले होते. आरजेडीने तेज रफ्तार, तेजस्वी सरकार हे कॅंपेन सुरु केले आहे, ज्यात तेजस्वी यादव यांना प्रोजेक्ट करण्यात आले आहे.

नितीश कुमार यांच्या नेतृत्वात भाजप लढणार निवडणूक –
नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीए निवडणूक लढणार आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणूकीत अमित शाह, नितीश कुमार सोबत होते, त्यामुळे त्यांच्या गठबंधनात वाद असल्याच्या चर्चा दूर झाल्या. 2015 साली विधानसभा निवडणूकीत राजद आणि जेडीयूने एकत्र निवडणूक लढली होती आणि भाजपवर मात केली होती, परंतु दोन वर्षानंतर नितीश यांनी राजदशी साथ सोडली आणि भाजपच्या तंबूत जाऊन दाखल झाले.