Bird Flu : …अन् अखेर राज्यावर संकट घोंघावले; ‘या’ 5 जिल्ह्यांत ‘बर्ड फ्ल्यू’ पसरला, प्रशासन सतर्क

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  कोरोनापाठोपाठ महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूचे (Bird Flu)संकट गहीरं होताना दिसत आहे. मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी दगावलेल्या 800 कोंबड्या य़ा बर्ड फ्ल्यूमुळेच मृत्यू पावल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडालेली आहे. असे असतानाच आता राज्यावर बर्ड फ्ल्यूचे मोठे संकट घोंघावू लागले आहे. बर्ड फ्ल्यूने पाच जिल्ह्य़ांत शिरकाव केला आहे. त्यामुळे प्रशासन अ‍ॅलर्ट झाले असून सर्वांना सतर्कतेचा आदेश दिला आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बर्ड फ्लू परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार आहेत.

परभणीसह मुंबई, ठाणे, दापोली आणि बीडमध्ये बर्ड फ्ल्यूची लागण झाली आहे. मुंबई, ठाणे, परभणी, दापोली आणि बीडमध्ये कावळे, पोपट आणि कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. या पक्ष्यांचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. या प्रयोगशाळेचा अहवाल आला असून या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परभणी तालुक्यातील मुरुंबा येथे एका पोल्ट्री फार्ममध्ये दोन दिवसांपूर्वी 800 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. या कोंबड्या बर्ड फ्लूनेच दगावल्याने निष्पन्न झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे.

मुंबईत दक्षता घेण्याच्या सूचना

दरम्यान, मुंबईत कावळे मृत्यूमुखी पडल्याने बर्ड फ्लू आल्याच्या अफवा पसरू लागल्या होत्या. ठाण्याच्या बगळे व पोपटांमध्ये बर्ड फ्लूचे विषाणू सापडले आहेत. रोगाबाबत अफवा पसरविण्यात येऊ नयेत. समस्या असेल, तर पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून त्याची माहिती द्यावी. मुंबईत आतापर्यंत बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचे मृत्यू झाल्याचे आढळले नाही. तरीही दक्षता घेणे आवश्यक आहे, अशा सूचना केल्या आहेत. ठाण्यातही 15 पाणबगळ्यांचा संशयास्पदरीतीने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या पक्ष्यांना कुठल्याही जखमा आढळून आल्या नाहीत. विशेष म्हणजे, मांजर, कुत्रे, कावळे यांनी या मृतदेहांना तोंडही लावले नाही. त्यामुळे गूढ वाढले आहे.