‘…पण गर्दी जमवणाऱ्या ‘गबरू’वर कारवाई नाही, महाराष्ट्र हळहळला, पण मुख्यमंत्री बोलले नाहीत’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तब्बल १५ दिवसांनंतर माध्यमांच्या समोर येऊन संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असा दावा केला. पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात अखेर मंत्री संजय राठोड यांनी मौन सोडलं. परंतु हा दावा करण्यापूर्वी संजय राठोड यांनी पोहरादेवी गडावर जोरदार शक्तीप्रदर्शन केले, हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होते, त्यावरून भाजपाने (BJP) ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) म्हणाले, की कोरोना काळात गर्दी केली म्हणून १० हजार जणांवर गुन्हे दाखल करू पण गर्दी जमवणाऱ्या एका गबरूवर कारवाई नाही, एका भगिनीचा जीव गेला, महाराष्ट्र हळहळला पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) बोलले नाहीत, महाविकास आघाडी सरकारचे महाराष्ट्रात तो मी नव्हेच हे सुरू आहे असा टोला त्यांनी लगावला.

पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणात आरोप झाल्यानंतर गेले १५ दिवस ‘नॉट रिचेबल’ असलेले वनमंत्री संजय राठोड अखेर पोहरादेवी येथे देवदर्शनासाठी अवतरले. तर मंत्री महोदयांच्या दर्शनासाठी हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली. गेल्या १५ दिवसांपासून राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे येथे गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी सकाळपासूनच तगडा बंदोबस्त लावला होता. जागोजागी तपासणी होत असतानाही राठोड पोहोचण्यापूर्वीच हजारो समर्थक पोहरादेवीच्या वेशीपर्यंत पोहोचले होते. कोरोना टाळण्यासाठी पोलिसांना गर्दी पांगविण्यासाठी लाठीमार करावा लागला. यात काही कार्यकर्त्यांनीही पोलिसांवर दगडफेक केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना अक्षरश: लाठीमार करावा लागला. तर दुसरीकडे कार्यकर्त्यांनीही पोलिसांवर दगडफेक केली. मंगळवारी दुपारी १ वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे पत्नीसह पोहरादेवी येथे पोहोचले. हजारो समर्थकांच्या गर्दीतून वाट करीत त्यांनी जगदंबा मातेचे मंदिर, संत सेवालाल महाराज मंदिर, संत बाबनलाल महाराज मंदिर व संत रामराव महाराज समाधीस्थळी जावून दर्शन घेतले. दरम्यान, मी गायब नव्हतो, तर आई-वडील म्हातारे असल्यामुळे त्यांना व पत्नीला धीर देण्यासाठी बंगल्यावर होतो. आता पोहरादेवीचे दर्शन करून पूर्ववत कामाला लागणार आहे. मागासवर्गीयांचा नेता असल्यामुळे माझ्यावर घाणेरडे आरोप करून माझे आयुष्य उद्‌ध्वस्त करण्याचे राजकारण केले जात आहे. माझी व समाजाची बदनामी थांबवा असं आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले.