‘महापौरांच्या मुलाला आणि जावयाला किती मिळाले ?’ : आशिष शेलारांचा सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अद्याप कोरोनावर पूर्णपणे ताब्या मिळवण्यात प्रशासनाला यश आलेलं नाही. इतकंच नाही तर ब्रिटनवरून(Britain) आलेल्या नव्या कोरोना व्हायरसमुळं (New corona virus) शाळा, कॉलेज सुरू करण्याचे निर्णय लांबणीवर टाकले जात आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा 15 जानेवारीपर्यंत बंद आहेत. मुंबई लोकल (Mumbai Local)  अद्याप पूर्ववत सुरू करण्यात आलेल्या नाहीत. अशातच आता मुंबई पालिकेनं कोरोनासंदर्भातील उपाययोजनांसाठी राज्य सरकारकडून 400 कोटींचा अतिरीक्त निधी मिळावा अशी मागणी केली आहे. याच मुद्द्यावरून आता भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पालिकेसमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

आशिष शेलार यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. त्यांनी लिहिलं की, मुंबई पालिकेचे कोरोनावर 6 महिन्यात 1600 कोटी खर्च झाले तरी अजून 400 कोटी हवेत असं पालिका म्हणत आहे. परंतु खर्च झालेल्या पैशाचा हिशोब का देत नाहीत. महापौरांच्या मुलाला आणि जावयाला किती मिळाले ? सॅनिटायझर पुरवणाऱ्या बोगस कंपन्यांच्या घशात किती घातले ? पर्यावरण प्रेमी वरळीला किती गेले ? असा सवाल त्यांनी केला आहे.

आपल्या आणखी एका ट्विटमध्ये ते लिहितात, 400 कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव परत पाठवा अशी सूचना स्थायी समितीत भाजपच्या नगरसेवकांनी मांडली. तो शिवसेनेनं नामंजूर का केला. का लपवाछवी करताय ? हिशोब द्या. मुंबईकर कोरोनानं दगावले. मात्र पालिकेत सत्ताधाऱ्यांनी कोरोना काळात आपले गोदाम भ्रष्टाचार करून भरले ? असंही शेलार म्हणाले आहेत.