नारायण राणेंचा ठाकरे सरकारला इशारा, म्हणाले – ‘तुमच्या सरकारच्या प्रत्येक खात्यांमधील भ्रष्टाचार पुराव्यानिशी समोर आणेन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील ठाकरे सरकारच्या प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार चालला असून तो आपण उघड करणार असल्याचे भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. मंत्रालयात केवळ टक्केवारीसाठी कामे चालतात. कोरोनाच्या औषधांच्या टेंडरमध्ये पैसे खाल्ले जात आहेत. संजय राऊतांनी हे जाहीर करावे अन्यथा मी जाहीर करेन. पोलीस वसाहतीच्या टेंडरमध्येही भ्रष्टाचार झाला असून प्रत्येक खात्यात चाललेला भ्रष्टाचार नावानिशी उघड करणार आहे. सरकारच्या तिजोरीत लोकांना देण्यासारखे काहीच नाही, असे सांगत राणे म्हणाले की, जनाची नाही आणि मनाचीही नाही असे हे सरकार आहे.

तौक्ते चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेले दौरा म्हणजे नुसता फेरफटका आणि नौटंकी दौरा असल्याचे राणे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी कोकणचा दौरा केला, पण त्यासाठी किती वेळ दिला असा सवाल त्यांनी केला आहे. केवळ तीन तासाच्या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पण या वादळात किती लोकांचे नुकसान झाले. किती जणांचे रोजगार गेले याची माहिती लोकांकडून घेतली नाही. मुख्यमंत्र्यानी लोकांची का भेट घेतली नाही?. मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसांत पॅकेज का जाहीर केले नाही? असा सवाल करत त्यांच्या आश्वासनामध्ये स्पष्टता नसल्याची टीका राणे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कोकणाला काय दिले. एक तरी प्रकल्प दिला का? पर्यटनासाठी काय दिले, किती विकास केला हे सांगावे भावनिक विषयावर गोड-गोड बोलून कोकणची फसवणूक केली जात असल्याचे राणे म्हणाले.