‘पटक देंगे’ पटक देंगे म्हणणाऱ्या अमित शाहांचे उद्धव ठाकरेंना ट्रिंग ट्रिंग

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपचा आग्रह कायम आहे. आता तर खुद्द भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी युती झाली नाही तरी विरोधकांना ‘पटक देंगे’ असं म्हटलं होतं. त्यामुळे शिवसेना आणखी खवळली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागील वर्षीच स्वतंत्र लढण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शिवसेना नेतेही अनेकवेळा युती न करता स्वतंत्र लढण्याचं वक्तव्य करत असतात. त्यामुळे सेना-भाजप युतीचं काय होणार असा प्रश्न दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर आहे. मात्र आता अमित शाह आणि भाजपने पुन्हा एक पाऊल मागे घेत, शिवसेनेला युतीसाठी गळ घातली असल्याची माहिती मिळते आहे.

युती गेली खड्ड्यात

सर्व माध्यमातून युतीविषयी चर्चा येत होत्या मात्र पंढरपुरातही महासभेत मी सांगितले होते. युतीची चर्चा गेली खड्ड्यात माझ्या शेतकऱ्यांचं काय ते बोला असे म्हणून युतीच्या चर्चेला उद्धव ठाकरे यांनी पुन्हा पूर्ण विराम दिला होता. बीड येथे आयोजित महासभेत ते बोलत होते.

शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपकडून हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला जातो. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी २०१४ मध्ये हिंदुत्व कुठे गेलं होतं असा प्रश्न विचारला होता. तसंच राज्यात शिवसेनाच मोठा भाऊ आहे, देशातही शिवसेनेचा आवाज दाखवू असा इशाराही त्यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यामुळे शिवसेना थेट टोकाची भूमिका घेत असताना, भाजपकडून मात्र सावध धोरण स्वीकारलं जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांची युती होईल आणि विधानसभा-लोकसभा निवडणूक आम्ही एकत्रच लढू, असा दावा अमित शाह यांनी चार दिवसांपूर्वी केला होता. विशेष म्हणजे देशात जे महागठबंधन होतंय, त्याचा फायदा भाजपलाच होईल, असा दावाही अमित शाहांनी केलाय. २०१४ पेक्षाही जास्त जागा घेऊन एनडीए सत्तेत येईल, असं ते म्हणालेत. २०१४ च्या निवडणुकीत एकट्या भाजपने २८२ जागा जिंकल्या होत्या. तर एनडीएतील मित्रपक्षांसह हा आकडा साडे तीनशेच्या आसपास होता.

युती हवी पण भाजप लाचार नाही: मुख्यमंत्री

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन दिवसांपूर्वी युती हवी आहे, पण भाजप लाचार नाही असं भाष्य केलं होतं. “देशाच्या कल्याणासाठी आणि देश चोरांच्या हातात जाऊ नये यासाठी आम्हाला युती हवी आहे. पण भाजप लाचार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ज्यांना हिंदुत्त्व हवंय ते येतील, नाही आले तर स्वबळावर लढण्याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. ही अटल बिहारी वाजपेयी आणि मोदींची भाजपा आहे, ती कुणासमोरही लाचार नाही, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला ठणकावलं होतं.