रावसाहेब दानवेंचा अजब दावा, म्हणाले – ‘शेतकरी आंदोनलामागे चीन आणि पाकिस्तानचा हात’

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने केलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात देशाची राजधानी दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरू असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी वादग्रस्त विधान केले आहे.

शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून, चीन (China) आणि पाकिस्तानचा (Pakistan) हात आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचं आंदोलन नाही, असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. जालना जिल्ह्यात एका आरोग्य केंद्राच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. दिल्लीत सुरू असलेले आंदोलन सुटाबुटातल्या लोकांचे असून, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असेही दानवे म्हणाले.

रावसाहेब दानवे यांच्या विधानामुळे शेतकरी आंदोलनावरून आता नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. आता जे आंदोलन सुरू आहे ते शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये मुस्लिम समाजाला उचकवलं गेलं आणि सीएए, एनआरसीमुळे मुस्लिमांना देशाबाहेर जावं लागेल, असं सांगितलं गेलं. पण एखादा तरी मुस्लिम नागरिक देशाबाहेर गेला का ? अशे रावसाहेब दानवे म्हणाले.