शेतकऱ्यांसाठी नवं ॲप, बळीराजाच्या ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’साठी होणार फायदा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होण्याबरोबरच त्यांच्या मालाला योग्य भाव आणि चांगली बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे. हे ॲप शेतकऱ्यांसाठी ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’साठी महत्वाचे साधन ठरणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी ई-पीक पाहणीबाबत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादाजी भुसे, कृषी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव संजय कुमार, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विकास रस्तोगी, निवृत्त मुख्य सचिव जयंत बांठिया, टाटा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनाथ नरसिंहन, प्रकल्प सल्लागार नरेंद्र कवडे, संभाजी कडू-पाटील, तंत्रज्ञ प्रमुख निलेश खानोलकर यांच्यासह टाटा ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी ‘विकेल ते पिकेल’ योजना
मुख्यमंत्री यांनी सांगितले की, कृषी विभागाने ‘विकेल ते पिकेल’ ही योजना आणली असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ, मालाला योग्य भाव मिळवून देणे यावर भर देण्यात येत आहे. यानुसार या मोबाईल ॲपमुळे शेतकरी वर्ग संघटित होणे आवश्यक आहे. ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये केवळ शेतकऱ्यांची माहिती गोळा करणे लक्ष्य नसून शेतकऱ्यांनी कोणतं पीक घेणे आवश्यक आहे, कोणते पीक कोणत्या विभागात घेतले जाणे गरजेचे आहे, कोणत्या पिकाला चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे, पिकाला योग्य भाव कसा मिळेल याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात राज्यातील पिकांचा नकाशा तयार करण्याचे उद्दिष्ट आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑनलाईन बरोबर ऑफलाईन माहिती
ई-पीक पाहणी संदर्भात मोबाईल ॲप विकसित करताना यामध्ये कोणत्याही उणीवा राहू नये यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. या मोबाईल ॲपचा उपयोग शेतकऱ्यांनाच होणार असल्याने त्यांच्यासाठी हे किती महत्त्वाचे आहे हे त्यांना समजावून सांगणे महत्वाचे आहे. वस्तुस्थिती दर्शक, सध्यस्थिती दर्शक माहिती संकलित करण्यासाठी हे उपयुक्त ठरणार आहे. या ॲपमध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन बरोबरच ऑफलाईन पद्धतीने माहिती, इमेजेस अपलोड करण्याची सोय देण्यात आली आहे ही अत्यंत चांगली बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कृषी मंत्री काय म्हणाले ?
या ॲपची अंमलबजावणी करताना याचे सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक असून या योजनेचा लाभ सरसकट सर्व शेतकरी वर्गाला मिळणे गरजेचे आहे. मिश्र पिक घेत असल्याची नोंद असणे, दुबार पेरणी करीत असल्यास त्याचे नेमके नियोजन, ग्रामसेवक आणि तलाठी यांच्यामार्फत रँडम चेकिंग याबाबतही नियोजन करणे आवश्यक आहे, असे मत राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले.

महसूलमंत्री थोरात काय म्हणाले ?
या नव्या ॲपमुळे शेतकऱ्यांच्या आणि तलाठी यांच्या वेळेची बचत होण्याबरोबरच शेतकऱ्यांना आपल्या पिकांची माहिती देणे अधिक सोपे होणार आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे या कामात पारदर्शकता, गतीमानता आणि अचूकता येण्यास मदत होणार आहे. एकाच वेळी 240 हून अधिक पिकांची माहिती मिळणे, पिकांची वर्गवारी करणे सोपे होणार आहे. सध्या नऊ तालुक्यातील शेतकऱ्यांकडून माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे. मात्र हे करत असताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना या प्रक्रियेत सामावून घेणे आवश्यक आहे.