नामांतरावरून वाद : शहरांची नावे बदलल्याने सर्वसामान्यांच्या जीवनात काही फरक पडणार का ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन –  औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर असे करावे, या शिवसेनेच्या मागणीला आघाडीचा घटक असलेल्या काँग्रेसने मात्र विरोध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आमचे दैवत आहेत. शहराचे नाव बदलल्याने सामान्यांच्या जीवनात काही फरक पडणार आहे का? असा सवाल उपस्थित करत ज्यावेळी आपण महाविकास आघाडी स्थापन केली. त्यावेळी सर्वसामान्य माणूस केंद्रभूत मानत त्याच्यासाठी काय चांगलं करता येईल हे उद्दिष्ट समोर ठेवल्याचे प्रत्युत्तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Congress state president and state revenue minister Balasaheb Thorat) यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊतांना (Shiv Sena leader MP Sanjay Raut) दिले आहे.

औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावर सध्या काँग्रेस आणि शिवसेनेत शाब्दिक चकमक सुरू आहे. काँग्रेसचे औरंगजेब नाही तर छत्रपती आराध्य असतील या शिवसेनेच्या वक्तव्यावर थोरात यांनी उत्तर दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे दैवत आणि श्रद्धास्थान आहे. या बाबतीत शंका बाळगण्याचे कारण नाही, असं त्यांनी म्हटले आहे. शहरांची नावे बदलल्याने सर्वसामान्य माणसाच्या जीवनात काय बदल होणार आहे? या उलट यामुळे जो सामाजिक विद्वेष निर्माण होईल तो फायदेशीर ठरणार नाही, ते उद्दिष्ट आपले नाही. आपण याबाबत चर्चा करू, असेही थोरात यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशात काही शहरांची नावे बदलली गेली, मात्र यामुळे काही फरक पडला का? निवडणूक आली की लोकांच्या भावनेच्या मुद्यावर राजकारण करायचं काम काहीजण करत असल्याची टीका भाजपाचे नाव न घेता बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.