काँग्रेसमध्ये राजीनाम्याचा ‘भूकंप’ की ‘त्सुनामी’ ? 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी नावाच्या सुनामी मध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. एवढेच नाही तर जे काँग्रेसचे बालेकिल्ले  समजल्या जाणाऱ्या मतदार संघात देखील काँग्रेसचा पराभव झाला. ही बाब काँग्रेस करिता  धक्कादायक आहे. त्यामुळेच आज दिल्ली येथे काँग्रेसच्या कार्यकारिणीबैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंह, मल्लिकार्जुन खर्गे, गुलाम नबी आजाद, पंजाबचे  मुख्यमंत्री कैप्टन अमरिंदर सिंह असे काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित आहेत.

राहुल गांधी राजीनामा देणार ?

या बैठकिदरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राजीनामा देणार अशी मोठी चर्चा आहे. काँग्रेसच्या अपयशाकरिता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला जबाबदार धरले जात आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या या बैठकीत नक्की कोणता निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या बैठकीत पराभवाच्या कारणांवर चर्चा केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मागील निवडणुकीत काँग्रेसला ४४ जागा मिळल्या होत्या तर यंदा काँग्रेसला ५२ जागा मिळल्या आहेत. वायनाड मतदार संघात राहुल गांधी विजयी झाले असले तरी त्यांच्या स्वतःच्याच घरात म्हणजेच अमेठी मतदार संघात त्यांचा ५५ हजार मतांनी स्मृती इराणी यांनी पराभव केला.

अशोक चव्हाण यांचा राजीनामा ?

एवढेच नाही तर राज्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण देखील राजीनामा देणार अशी चर्चा होती. काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नांदेड लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे  दिग्गज नेते अशोक चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदार संघात काँग्रेसची जागा येणारच असे मानले जात होते मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण  त्यांची जागा राखण्यास अपयशी  ठरले आहेत. नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला.

निवडणुकीनंतर माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी राजीनाम्याबाबत ‘पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल’ असे अशोक चव्हाण म्हणाले होते. त्यानंतर आता काँग्रेसची बैठक आयोजित केल्यामुळे या बैठकीतच अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याचा फैसला होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.