पराभवाचं ‘असं ‘ विश्लेषण करणार काँग्रेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत भाजपाला अनपेक्षित यश मिळालं असलं तरी तोच मुद्दा आता काँग्रेसच्या वर्तुळात महत्वाचा ठरला आहे. काँग्रेसचा दारुण पराभव नेमका कशामुळे झाला हा प्रश्न आता चर्चेला आला आहे आणि त्याला ‘ईव्हीएम’ घोटाळ्याची किनार आहे का ? हेही आता काँग्रेस तपासणार आहे. एकेकाळी ३०० हुन अधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला ५२ जागा कशा काय ? यावर काँग्रेसने भर देऊन आता प्रत्येक मतदानकेंद्रानुसार विश्लेषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसभा निवडणुकांच्या आधीपासूनच विविध राज्यांमध्ये ईव्हीएमनुसार होणाऱ्या मतमोजणीत घोटाळा होत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. यासंदर्भात सर्व विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिकाही दाखल केली होती. ईव्हीएम हॅक होण्याचे, ईव्हीएम घोटाळ्याचे आरोप निवडणूक आयोगाने वारंवार फेटाळले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही लोकसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम घोटाळा झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आता काँग्रेसने या वर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी सर्व उमेदवारांकडून निवडणूक आयोगाने दिलेला फॉर्म क्रमांक २० मागवण्यात आला आहे. फॉर्म क्रमांक २०मध्ये प्रत्येक मतदानकेंद्रावर उमेदवाराला किती मते मिळाली याची तपशीलवार माहिती दिली असते.

प्रत्येक मतदान केंद्रातील परिक्षेत्रात मतदाना आधी काँग्रेस सर्व्हे केला होता. त्या सर्व्हेचे निकाल आणि उमेदवाराला मिळालेली एकूण मते याची चाचपणी होणार आहे. जर दोन्ही आकड्यांमध्ये जास्त फरक नसेल, इतर काही कारणांमुळे मतं कमी मिळाली असतील तर संघटना बळकट करण्यासाठी काँग्रेस पक्ष रणनीती आखणार आहे. पण जर या दोन आकड्यांमध्ये प्रचंड तफावत आढळल्यास संबंधित मतदान केंद्रांवर ईव्हीएम घोटाळा तर झालेला नाही याची पडताळणी काँग्रेस पक्षाकडून केली जाणार आहे.