पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन
महाराष्ट्राबरोबरच देशभरातील जनतेवर मागील चार वर्षात भाजप सरकारने सत्तेचा गैरवापर करीत अन्याय केला आहे. जनतेवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसने 31 ऑगस्टपासून जनसंघर्ष यात्रा सुरु केली आहे. कोल्हापूर येथून सुरु केलेली ही जनसंघर्ष यात्रा सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातून शुक्रवारी 7 सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवडमध्ये येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5656b26d-aea1-11e8-befe-f5fd64df2d92′]
रविवारी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत यावेळी सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, महिला कॉंग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, माजी महापौर कविचंद भाट, लक्ष्मण रुपनर, नरेंद्र बनसोडे, मयूर जैसवाल, विशाल कसबे, शहाबुद्दीन शेख, मकर यादव, सुंदर कांबळे, बाळासाहेब साळुंखे आदी उपस्थित होते.
साठे यांनी सांगितले की, शुक्रवारी 7 सप्टेंबर रोजी सायं. 5 वाजता नवी सांगवी येथील नटसम्राट निळू फुले सभागृहात जनसंघर्ष यात्रेनिमित्त सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार मल्लीकार्जून खर्गे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुवा, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, महिला प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब शिवरकर, उल्हास पवार, सरचिटणीस रत्नाकर महाजन आदींसह प्रदेश कार्यकारीणीतील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
[amazon_link asins=’B0734VLDTC,B00DRLASZ6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’60b25e73-aea1-11e8-a8dd-435f06b57f5d’]
कोल्हापूर येथून सुरु झालेल्या या जनसंघर्ष यात्रेस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. भाजपच्या कार्यकालात जातीय सलोखा राहिला नाही. नोटाबंदीच्या चुकीच्या निर्णयामुळे नागरिकांचा होता तो ही रोजगार हिरावून घेतला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेले एकही आश्वासन या सरकारला पूर्ण करता आले नाही, याचा जाब विचारण्यासाठी नागरिक उत्स्फूर्तपणे जनसंघर्ष यात्रेत सहभागी होत आहेत. नागरिकांच्या पैशातून फसव्या जाहिराती हे सरकार करीत आहे. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्रचा जाहिरातबाजीचा फसवा फुगा आता फुटला आहे. शेतक-यांच्या आत्महत्येत, बेरोजगारीत, गुन्हेगारीत, महागाईत लक्षणीय वाढ होत आहे. बांधकाम क्षेत्रासह उद्योग व्यापारात देखील मंदीचे सावट आहे. शेतक-यांच्या शेतमालाला दिडपट हमी भाव देऊ, सातबारा कोरा करू, सिंचनक्षमता वाढवू, देशात उत्पादीत शेतमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देऊ अशी शेकडो आश्वासने नागरिकांच्या पैशातून जाहिरातबाजी करून भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारने करदात्या नागरिकांच्या माथी मारीत आहेत, अशीही टीका साठे यांनी या वेळी केली.
सरकारने नुकतीच महामंडळाच्या अध्यक्षांची यादी जाहिर केली. यामध्ये पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सदाशीव खाडे यांची नियुक्ती करण्यात आल्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, साठे यांनी सांगितले की, सत्तेचे दबावतंत्र वापरून पिंपरी चिंचवड प्राधिकरण पीएमआरडीएमध्ये विलीन करण्याचा कुटील डाव पालकमंत्र्यांनी आखला होता. याला सर्वप्रथम कॉंग्रेसने विरोध केला होता. नागरिकांच्या व माध्यमांच्या दबावामुळे सरकारला ते शक्य झाले नाही. प्राधिकरणाच्या ताब्यात असणा-या भूमीपुत्रांच्या जमिनी, प्राधिकरणाच्या ठेवी व मालमत्ता गिळंकृत करण्याचा शासनाचा डाव होता. स्थानिक नागरिकांच्या हक्कांवर यामुळे गदा येणार होती. खाडे यांच्या नियुक्तीचे स्वागतच आहे, परंतू त्यांच्या कार्यकालात प्राधिकरणाशी संबंधित साडे बारा टक्क्यांचा परतावा, प्राधिकरण हद्दीतील अतिक्रमणे, आवश्यक विकास प्रकल्प, सदनिका, प्लॉट हस्तांतरण शुल्क आकारणी असे विविध प्रश्न मार्गी लागावेत अशीही अपेक्षा साठे यांनी व्यक्त केली. काही महामंडळांवर शिवसेनेच्या पदाधिका-यांनी नियुक्ती स्विकारल्याबाबत प्रश्न विचारला असता साठे म्हणाले की, शिवसेनेने राजीनामा या शब्दाचे महत्वच कमी केले आहे. त्यामुळे शिवसेनेवरील नागरिकांचा विश्वासच उडाला आहे, असे त्यांनी सांगितले.
लोकसभा उमेदवारीसाठी भाजपमध्ये वाढली चुरस