पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बांधकाम क्षेत्र आणि ऑटो उद्योगाला अपेक्षित सवलती न दिल्याने या क्षेत्रांवर अवलंबून असलेल्या पुण्यासाठी निराशाजनक आणि मारक अंदाजपत्रक असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.
पुण्याच्या स्मार्ट सिटी योजनेचा पत्ता लागेना आणि देशात आणखी पाच स्मार्ट सिटीची घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली, म्हणजे मोदी सरकारचा जुमला म्हणावा लागेल, असे मतही जोशी मोहन जोशी यांनी व्यक्त केले. शहरांमधील बेरोजगारांसाठी निराशाजनक अंदाजपत्रक असल्याचे जोशी म्हणाले.
स्मार्ट सिटी, मेट्रो प्रकल्प, मुठा नदी सुधारणा अशा मोठ्या प्रकल्पात केंद्र सरकारने पोकळ घोषणा केल्या. या योजनांना गती देण्याचा प्रयत्न अंदाजपत्रकात नाही. शंभर शहरे स्मार्ट सिटी योजनेसाठी जाहीर झाली याकरिता केलेल्या तरतुदीपैकी पंचवीस टक्के सुध्दा खर्च झालेला नाही याची कबुली अंदाजपत्रकात देण्यात आली आहे. पुण्यात तर स्मार्ट सिटीचा पहिला टप्पा पूर्ण झालेला नाही, हा अनुभव लोकांसमोर असताना आणखी पाच नव्या स्मार्ट सिटी जाहीर करण्याचे धाडस तरी कसे केले जाते. अशा पोकळ घोषणा म्हणजे मोदी सरकारचा नवा जुमला अशी टीका जोशी यांनी केली आहे.
पुण्यासारख्या शहरात अनेक व्यवसाय मंदावले आहेत, पर्यायाने बेरोजगारी वाढली आहे, या बेरोजगारांसाठी अंदाजपत्रकात आशेचा किरण नाही. युवकांसाठी चिंताजनक स्थिती म्हणावी लागेल.
अंदाजपत्रक सादर होत असताना शेअर बाजार एक हजार पॉईंटने कोसळला, हा उद्योग क्षेत्राचा नाराजीचा सूर दाखविणारा आहे. सामान्य माणसाच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत, पुण्याच्या दृष्टीने ऑटो आणि बांधकाम क्षेत्राला अनुकूल घोषणा नाहीत त्यामुळे या क्षेत्रातील मंदीचे सावट दूर होणार नाही, त्यामुळे पुण्याच्या आर्थिक उलाढालीसाठी बजेट मारक आहे, असे जोशी यांनी म्हटले आहे.