शेतकरी आंदोलन : 8 डिसेंबर रोजीच्या ‘भारत बंद’ला काँग्रेससह तृणमूल आणि TRS चा जाहीर पाठिंबा

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाईन – केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या 8 डिसेंबर रोजीच्या ‘भारत बंद’ ला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस ( Trinamool Congress Party) आणि तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे मोदी सरकारसमोर आता मोठी कोंडी निर्माण झाली आहे.

दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 11 वा दिवस आहे. कडाक्याच्या थंडीचा विचार न करता पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या मांडून आहेत. विरोधी पक्षांनी भारत बंदला पाठिंबा जाहीर केला असताना दुसरीकडे शेतकरी संघटनांच्या नेत्यांचीही बैठक सुरू आहे. आंदोलनाबाबतची पुढची रणनिती ठरविण्यासाठी शेतकरी संघटनांचे नेते चर्चा करत आहेत.

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला काँग्रेस पक्ष पूर्णपणे समर्थन देणार असल्याचे सांगितले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि टीआरएसचे अध्यक्ष के.चंद्रशेखर राव यांनीही बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनेही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. तृणमूल काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे आणि भारत बंदमध्ये पक्ष पूर्ण सहकार्य करेल, असे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांनी सांगितले आहे.