सावधान ! ‘कोरोना’तून बर्‍या झालेल्या रुग्णांना पुन्हा लागण, रिसर्चमधून नवी माहिती समोर

पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक झाल्याने रुग्णांच्या संख्येने तब्बल 50 लाखांचा टप्पा पार केलाय. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 50,20,360 वर पोहोचलाय.

देशात मागील 24 तासांत कोरोनाचे 90,123 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 1,290 जणांचा मृत्यू झालाय. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात सुमारे 82,066 लोकांना जीव गमवावा लागलाय.

कोरोनाचा धोका हा दिवसागणिक वाढत आहे. तसेच रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जाताहेत. याच दरम्यान कोरोनासंदर्भात नवीन माहिती समोर येत आहे.

कोरोनातून बर्‍या झालेल्या रुग्णांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण होत आहे. एका संशोधनातून हा धोक्याचा इशारा दिला आहे.

नोएडामधील दोन आणि मुंबईतील चार आरोग्य कर्मचार्‍यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झालीय. दिल्ली सीएसआईआरच्या इन्स्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव बायोलॉजी (आयजीआयबी) च्या रिसर्चमध्ये हा खुलासा केला आहे.

आयजीआयबीचे अनुराग अग्रवाल यांनी देशात रुग्णांना दुसर्‍यांदा कोरोनाची लागण होत आहे. यामध्ये मुंबईतील चार आणि नोएडातील दोन रुग्णांचा समावेश आहे, असे म्हंटलं आहे.

कोरोनाची पुन्हा लागण होते का? याचा तपास करण्यासाठी आयजीआयबीच्या एका टीमने देशभरातून 16 आरोग्य कर्मचार्‍यांचे सँपल घेतले आहे. तसेच त्यांची चाचणी केली जातेय.

गव्हर्नमेंट इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायंसेज, ग्रेटर नोएडाचे डॉ. राकेश गुप्ता यांनी सांगितले की, नोएडातील दोन्ही आरोग्य कर्मचारी हे एकमेकांच्या संपर्कात आले होते.

एका कोरोनाबाधिताला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. तर दुसर्‍या रुग्णाला घरात आयसोलेट केलं. ज्या व्यक्तींची रोगप्रतिकार क्षमता मजबूत नाही त्यांच्यावर विषाणू पुन्हा हल्ला करत आहे.

कोरोनाशी लढण्यासाठी शरीरात रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यास शरीरात असलेला विषाणू पुन्हा शरीरात पसरतो. अन् पुन्हा कोरोनाची लागण होते.

तज्ज्ञांनी सांगितले की, उपचारानंतर कोरोनातून बर्‍या झालेल्या जवळपास 14 टक्के लोकांमध्ये दुसर्‍यांदा कोरोनाची लक्षणं आढळली आहेत. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.

कोरोनाचा धोका पुन्हा निर्माण होत असल्याने रुग्णांत भीतीचे वातावरण आहे. कोरोनावर मात करण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जाताहेत.

देशासाठी दिलासादायक बाब म्हणजे 50 लाख कोरोनाग्रस्तांपैकी 39 लाख जणांनी कोरोनावर मात केलीय. तर देशात कोरोनाचे 9 लाख 95 हजार 933 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

देशातील काही राज्यांमध्ये कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालीय. अशा राज्यांत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात दररोज कोरोनाचे 20 हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत.

कोरोनाबाबत सिरो सर्व्हेमधून एक धक्कादायक माहिती समोर आलीय. दिल्लीत ऑगस्ट महिन्यात केलेल्या सिरो सर्व्हेनुसार कोरोनामुक्त झालेल्या 30 टक्के रुग्णांमध्ये अँटीबॉडी दिसून आल्या नाहीत.

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांत कोरोनाविरोधात रोगप्रतिकारशक्ती विकसित होत आहे, हे गृहितक खोटे ठरलं आहे. तसेच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्याचेही समोर आलंय.