…तर पुन्हा कठोर ‘लॉकडाऊन’, CM ठाकरेंचा जनतेला ‘इशारा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आता आपल्याला कोरोनासोबत जगायचं असल्याने लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने हटवण्यात येत आहे. काही गोष्टी अंगवळणी पडायला हव्यात यासाठी निर्बंध हळूहळू शिथिल केले जात आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. पुनश्च हरिओम म्हणून आपण काही सवलती दिल्या. मात्र त्या देताच सगळ्यांचीच रस्त्यावर झुंबड उडाली सरकार देत असलेली ही उघडीप जीवघेणी ठरत असल्यास पुन्हा कठोर लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला.

नाइलाजाने पुन्हा कठोर लॉकडाऊन
सरकार अतिशय सावधपणे पावलं टाकत आहे. आपण कोणतीही घाई करत नाही. टप्प्याटप्प्यानं आपण लॉकडाऊन लागू केला तसाच टप्प्याटप्प्याने आपण निर्बंध शिथिल करत आहोत. सकाळी व्यायाम करण्यासाठी, फिरण्यासाठी सवलत दिली आहे. मात्र ही सवलत देताच रस्त्यांवर गर्दी झाली. ही गर्दी टाळायला हवी. जर लोकांनी गर्दी करणं कमी केलं नाही, जी शिथिलता आहे त्यातून नुकसान होत आहे हे लक्षात आलं तर नाइलाजाने पुन्हा कठोर लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

केंद्राकडे लोकल सुरु करण्याची मागणी
मुंबईतील लोकलसेवा सुरु करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. जीवनावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्राकडे लोकलची मागणी कोली आहे. लोकलसेवा सुरु नसल्यानं रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर जाता येत नाही. लोकलसेवा सुरु झाल्या तर त्यांना कर्तव्यावर जाणं शक्य होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.