Coronavirus : कर्ज हप्त्यासह सर्व प्रकारची वसुली थांबवा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनामुळे ठप्प झालेला व्यवहार पहाता केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरुपात सर्व वित्तीय संस्थांच्या सर्व प्रकारच्या वसुलीला स्थगिती द्यावी. सर्व प्रकारचे कर्ज हप्ते, कॅश क्रेडिटचे व्याज, क्रेडिट कार्डांची बिले आदींचा भरणा तुर्तास स्थगित करावा, अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

अशोक चव्हाण यांनी याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री यांना पत्र लिहले असून राज्य शासनाने केंद्र सरकारला यासंदर्भात शिफारस करावी अशी विनंती केली आहे. कोरोनामुळे नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व खासगी आस्थापने बंद करण्यात आली आहेत. परंतु अद्याप कर्जाची वसुली, ईएमआय, इन्स्टॉलमेंट्स, ऑटो डेबिट आदी बाबी थांबवण्यात आलेल्या नाहीत, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

अशोक चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे की, शेतकरी, लहान-मोठे व्यापारी, उद्योजक, नोकरदार, कंत्राटी कर्मचारी, कामगार असे समाजातील सर्व घटक सध्या घरात अडकून पडले आहेत. बहुतांश लोकांकडे फारसे पैसे नाहीत. अत्यावश्यक सेवा म्हणून बँका भलेही सुरु असतील. पण उद्योग-व्यवसाय सारे ठप्प असल्याने पैशांची देवाण घेवाण थांबली आहे.. कर्जाचे हप्ते, इन्स्टॉलमेंट भरायला लोकांनी पैसे आणायचे कुठून हा प्रश्न आहे. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करावा आणि सर्व वित्तीय संस्थांची, बँकांची सर्व प्रकारची वसुली तात्पुरती स्थगित करावी, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.