Nisarga Cyclone : रायगड जिल्ह्यासाठी तातडीने 100 कोटींची मदत, मख्यमंत्र्यांची घोषणा

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – निसर्ग चक्रीवादळाचा बुधवारी कोकण किनारपट्टी भागात जोरदार तडाखा बसला. यात रायगड जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. येथील आलीबाग आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांना या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (शुक्रवार) अलिबाग दौऱ्यावर आले होते. यावेळी सर्वाधिक नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यासाठी राज्य सरकारकडून 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत घोषणा केली.

निसर्ग चक्रीवादळामुळे इतर जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीनुसार मदत जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आज अलिबागमध्ये जाऊन नुकसानीचा पाहणी दौरा केला. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या.

तातडीने जे काही करता येईल ते करण्यास सुरुवात केली आहे. पंचनाम्यांना आठ ते दहा दिवस लागतील. त्यानंतर नुकसानभरपाई सरकार देईलच पण तातडीने रायगड जिल्ह्यासाठी सरकारकडून शंभर कोटी रुपये देत आहोत. याचा अर्थ शंभर कोटींवर फूलस्टॉप आहे, असे नाही. जशी रायगडसाठी घोषणा केली, तसंच इतर जिल्ह्यांमध्ये नुकसान झालं, त्यानुसार काळजी घेणार आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मी आज तातडीने रायगडला आलो, ते इथल्या लोकांचं कौतुक करायला. सरकारला मदत केल्याबद्दल धन्यवाद करायला आलो असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, जागतिक पर्यावरण दिनालाच मला रायगडमध्ये वेगळ्या कारणाने यावं लागलं. या दिवशी मला वृक्षांची पडझड पहायला मिळाली. दोन दिवसांपूर्वी आपण निसर्गाचं रौद्ररुप पाहिलं आणि रायगडवासियांनी ते अनुभवलं. रायगडमधल्या लोकांना दिलासा देण्यासाठी आलो आहे, पण त्यांचं कौतुक करायला आलोय. ही जनता भीषण तांडवाला तोंड देत होती, असं त्यांनी म्हटलं आहे.

चक्रीवादळाचा धोका टळला पण कोरोनाचा आहे
चक्रीवादळाच्या धोक्यातून बाहेर पडलो असलो तरी अद्याप कोरोनाचं संकट गेलेलं नाही. अधिक मोठा धोका पुढे आहेच, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अनेक ठिकाणी पडझड झाली, त्याची साफसफाई करावी लागेल. पालापाचोळा कुजेल, एखादं जनावर मेलं असेल ते सडण्याची शक्यता आहे. त्यामधून पुन्हा रोगराई वाढेल, त्यामुळे साफसफाई करावी लागणार आहे. वीजपुरवठा, मोबाइल सेवा पूर्ववत करायच्या आहेत, घरांची पडझड झाली आहे, ही कामं प्राधान्यानं करत आहोत. आधीच एक संकट आलेलं असताना हे संकट आलं होतं हे न विसरता पुढे काम करायचं असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
1. आपत्ती काळात जीवितहानी होऊ नये यासाठी प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने प्राणहानी झाली
2. कोरोना संकट आहेच, काळजी घेतली त्यात वादळ आले, आता पुन्हा नव्याने सुरु करायचे आहे.
3. हे नुकसान भरून येणार नाही, शासनाने मदत दिली पण यापुढे जीवितहानी होता कामा नये यासाठी प्रशासन प्रयत्न करणार
4. प्रथम झाडांची साफसफाई करावी लागेल, आवश्यक त्या सर्व सुविधा आणि मदत केली जाईल.
5. संकट सर्वांसाठी असते, पक्ष मतभेद विसरून आपण एकत्र काम करून रायगड जिल्हा पुन्हा उभा करू.
6. घरांची पडझड झाली आहे त्यांना तातडीने मदत करणार
7. मच्छिमारांचे जे नुकसान झाले आहे त्याबद्दल शासन मदत देणार.