महाआघाडीतील अंतर्गत पक्षांतरासाठी पक्षश्रेष्ठींची संमती आवश्यक : छगन भुजबळ

नाशिक : पोलिसनामा ऑनलाईन – आगामी काळात स्थनिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होणार आहेत. नुकतीच राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. सर्वांनाच उमेदवारी देणे शक्य नसते त्यामुळे पक्षांतर होत आहे. मात्र आता राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचे महाआघाडी सरकार असल्याने पक्षांतर करण्यापूर्वी संबंधित पक्षांतील पक्षश्रेष्ठींची संमती अत्यावश्यक असल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, राज्यातील अन्य पक्षांमधील बरेच नेते राष्ट्रवादीत यायला इच्छुक असले तरी त्याबाबत आत्ताच काही सांगता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भुजबळ म्हणाले, पक्षांतराबाबत अनेकांच्या भेटीगाठी होत असतात, अन्य पक्षांमधील नेते, पदाधिकारीदेखील राष्ट्रवादीत यायला इच्छुक आहेत; मात्र त्याबाबत आत्ताच काही बोलणार नाही. बाळासाहेब सानप यांच्यासारखे अनेक जण राष्ट्रवादीत यायला इच्छुक असले तरी महाआघाडीतील पक्षांतराबाबतचा निर्णय हे संबंधित पक्षांचे पक्षश्रेष्ठीच घेणार आहेत. प्रत्येक पक्षाचे नेते आपल्या कार्यकर्त्यांना सर्व जागा लढवा, असे सांगत असले तरी त्यात काही चुकीचे नाही. कदाचित नाशिक मनपाची निवडणूक महाआघाडी एकत्रित लढवेल किंवा सर्व पक्ष स्वतंत्र लढून निवडणुकीनंतरही एकत्रित येऊ शकतील.

नाराज हा माध्यमांचा शब्द
मागासवर्गीय, अल्पसंख्याक, गोरगरिबांना न्याय द्यावा, हे काँग्रेसचे पूर्वीपासूनचे धोरण आहे.
त्यामुळे राज्यातील सरकारवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी नाराज आहेत, या चर्चेत तथ्य नाही. नाराजी हा माध्यमांनी पसरवलेला शब्द आहे. त्यामुळे आपण ध्येयधोरणाकडे लक्ष द्यावे, असे सांगण्यात काही वावगे नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्षदेखील मुख्यमंत्र्यांना भेटतात तेव्हा काही विशेष प्रश्न किंवा निर्णय असतील तर त्यावर चर्चा, सल्लामसलत करतात, असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.