काँग्रेस आणि इतर पक्षांनी दिल्ली पेटवली, आठवलेंचा ‘गंभीर’ आरोप

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीमध्ये मागील तीन दिवसांपासून सीएए आणि एनआरसी विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. यामध्ये आतापर्यंत 13 जणांचा बळी गेला आहे. तर 150 जण जखमी झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणात काँग्रेस आणि इतर बाकीचे पक्ष आहे. त्यांच्या माध्यमातूनच दिल्ली पेटवण्यात आली असा गंभीर आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंढरपूरमध्ये केला आहे.

रामदास आठवले हे पंढरपूरमध्ये एका मेळाव्यासाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. दिल्लीमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. काँग्रेस आणि इतर पक्षाने लोकांना भडकवण्याचे काम कलं आहे. त्यामुळे दिल्ली पेटली आहे. दिल्लीसह भारत देश शांत राहावा असे मत त्यांनी व्यक्त केलं. तसेच देशात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आले असताना दिल्लीमध्ये हिंसाचाराची घटना घडत असेल तर या घटनेमागे कोणाचा हात आहे, याची चौकशी करावी अशी मागणी आठवले यांनी यावेळी केली.

दरम्यान, दिल्लीतील मौजपुर, जाफराबाद, चांदबाग आणि करावल या भागात हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे या ठिकाणी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की दिल्लीमध्ये 11 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच तणावग्रस्त भागात ड्रोनद्वारे टेहाळणी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान हिंसाचाराग्रस्त भागातील शाळा, कॉलेजेस उद्या बंद ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.