Devendra Fadnavis In Akola | काँग्रेसने बाबासाहेबांना निवडून येऊ दिले नाही, आता प्रकाश आंबेडकरांना…, देवेंद्र फडणवीसांची अकोल्यात टीका
अकोला : Devendra Fadnavis In Akola | आपण सकारात्मकतेने पुढे जात आहोत. पुढे बाळासाहेब येतील, काँग्रेसचा देखील उमेदवार राहील. आपल्याला काही करण्याची गरज नाही. इतिहास तपासून बघा, काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना (Babasaheb Ambedkar) निवडून येऊ दिले नाही. अकोल्यामध्ये काँग्रेस बाळासाहेब आंबेडकरांना (Balasaheb Ambedkar) निवडून येऊ देणार नाही. त्यामुळे आपल्याला चिंता करण्याची गरज नाही, अशी टीका भाजपा नेते (BJP Leader) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते अकोल्यात आयोजित प्रचार सभेत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही देशाची निवडणूक आहे. अनुप धोत्रे यांचे कमळाचे बटन दाबल्यानंतर ते मत नरेंद्र मोदींना भेटते. पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदींना परत बसवण्यासाठी ही निवडणूक आहे. १० वर्षांत नरेंद्र मोदींनी २५ कोटी जनतेला गरिबी रेषेच्या वर आणले. अर्थव्यवस्थेचा विस्तार केला.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, देशातील वंचितांचा विचार काँग्रेसने किंवा वंचित आघाडीने नव्हे तर मोदींनी केला. संविधान बदलण्याच्या अफवा पसरवल्या जातात. मात्र, चंद्र, सूर्य असेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कुणीही हात लावू शकत नाही. संविधानाची हत्या तर १९७५ साली काँग्रेसने केली होती. या नाटकबाजांची नाटके आता चालणार नाहीत.
फडणवीस म्हणाले, पुढील पाच वर्षात देशाला जगातील तिसरी मोठी आर्थिक महासत्ता नरेंद्र मोदींना बनवायची आहे.
देशात अनेक संधी तयार होतील. ही निवडणूक जनतेची आहे.
अनुप धोत्रे यांच्या पाठीशी महायुतीतील सर्व नेते असून ते आपल्या वडिलांचादेखील विक्रम मोडतील.
दरम्यान, आज अकोल्यातील महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी उमेदवारी अर्ज भरला.
यावेळी आयोजित सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. या सभेला पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,
प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आ. रणधीर सावरकर, आ. हरीश पिंपळे,
आ. प्रकाश भारसाकळे, आ. वसंत खंडेलवाल, आ. अमोल मिटकरी इत्यादी उपस्थित होते.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pimpri Murder Case | पिंपरी : मित्राचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला मध्य प्रदेशातून अटक