‘EVM’ च्या सुरक्षेची जबाबदारी निवडणूक आयोगाची : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलची आकडेवारी समोर येताच विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर हल्ला चढविला आहे. आज दिल्लीत १९ विरोधी पक्षांनी एकत्र येत ईव्हीएमप्रश्नी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.

आता माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही ईव्हीएमशी कथित छेडछाडीच्या शक्यतांबाबत चिंता व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाच्या ताब्यात असणाऱ्या सर्व ईव्हीएमची सुरक्षा ही आयोगाची जबाबदारी असल्याचे प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे.

प्रणव मुखर्जी यांनी एक निवदेन जारी केले आहे. त्यात ते लिहितात, ‘आपल्या लोकशाहीच्या मूळ तत्वांना आव्हान देईल अशा शक्यतांना कोणतंही स्थान असू नये. जनादेश पवित्र आहे आणि तो कोणत्याही प्रकारच्या संशयापलीकडचा असायला हवा. एक्झिट पोलनंतर विरोधकांमधील हालचाली वाढल्या आहेत.

दिल्लीत विरोधकांच्या बैठका वाढल्या आहेत. दरम्यान, सर्व ईव्हीएम मशीनमध्ये व्हीव्हीपॅट लावण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.