शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी 29 तारखेला मोर्चा काढणार : खासदार राजू शेट्टी

पुणे पोलीसनामा ऑनलाइन

राज्यातील ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी येत्या 29 जूनला पुण्यातील अलका चौकातून साखर संकुलावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरले असून त्याच्या निषेधार्थ 29 जून रोजी पुण्यात मोर्चा काढला जाणार आहे. त्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अद्यापही साखर कारखानदारांनी एफआरपी दिली नाही. ती त्वरित द्यावी किंवा साखर आयुक्तांनी कारखाना मालकाची मालमत्ता जप्त करावी. तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट असून दुधाचे दर घसरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे या सरकारने लिटर मागे पाच रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली.