भूदान चळवळीतील अखेरच्या शिलेदारांचे निधन 

वसमत : पोलिसनामा ऑनलाईन 
मराठवाडय़ाचे गांधी ज्येष्ठ सर्वोदयी नेते, स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी विचारवंत गंगाप्रसाद अग्रवाल यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने दुपारी पावणेदोन वाजता राहत्या घरी निधन झाले.
महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे विचार अंगीकारत मराठवाडय़ाच्या आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या अखेरच्या शिलेदाराचे निधन झाल्याने मराठवाडाभर हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर  शुक्रवारी सकाळी ९ वाजता वसमत येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
हिंगोली जिह्यातील वसमत येथील रहिवासी असलेले गंगाप्रसाद अग्रवाल यांचा जन्म ७ जानेवारी १९२३ रोजी झाला. अंबाजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयात मॅट्रिक तर वर्धा येथील बियाणी महाविद्यालयात कॉमर्स इंटरपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले. याच काळात गांधी विचाराने प्रभावित झालेल्या गंगाप्रसाद यांनी १९४२ च्या चले जाव आंदोलनात उडी घेतली.
दरम्यान, त्यांचे नाते महात्मा गांधी, विनोबा भावे आणि स्वातंत्र्यसंग्राम आणि भूदान आंदोलन याच्याशी जोडले गेले.  महाविद्यालयात शिकत असताना चले जावो चळवळी आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैदराबाद मुक्ती संग्रामात त्यांनी मोलाची कामगिरी केली. आजेगाव येथील लढय़ात शस्त्र घेऊन ते प्रत्यक्ष लढले. मराठवाडय़ातील गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, चंद्रकोंत पाटील इत्यादी दिग्गजांच्या बरोबर अनेक सामाजिक आघाडय़ांवर त्यांनी बिनीचे शिलेदार म्हणून काम केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने त्यांना ‘डी.लिट.’ या मानद पदवीने गौरविले होते.
स्वातंत्र्योत्तर भारतात गांधीजींच्या कल्पनेतील स्वराज्य आणण्यासाठी झेंडा सत्याग्रह, जंगलतोड सत्याग्रह, १९६२ व ६५च्या युद्धाच्यावेळी शांतीसेनेचे कार्य, जयप्रकाश नारायण यांच्याबरोबर १९४२ ला आंदोलन, आणीबाणीच्या काळात १९ महिने तुरुंगवास, विनोबांच्या भूदान आंदोलनातील आघाडीचे शिलेदार, त्यानंतर दुष्काळाविरुद्ध झुंज अभियान, मराठवाडय़ाच्या पाणीप्रश्नासाठी  संघर्ष, भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन, बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यावर हिंदू-मुस्लीम ऐक्य व शांतता प्रस्थापन कार्य, जंगल-जमिनी यांचे ग्रामसभेला अधिकार मिळावेत यासाठीची लढाई अशी अनेक मोठी कामे त्यांच्या कार्ययादीत आहेत.