पालिकेकडून दिल्या जाणाऱ्या औषधातून ७६ विद्यार्थ्यांना विषबाधा; एका विद्यार्थिनीचा मृत्यू
मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन
मुंबईतील गोवंडीच्या शिवाजीनगरमधील पालिकेच्या संजय नगर महापालिका उर्दू माध्यमातील शालेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गोवंडी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, उर्दू शाळेत महानगरपालिकेकडून दिल्या जाणाऱ्या औषधामुळे या विद्यार्थीनीला विषबाधा झाली असल्याचे सांगितले जात आहे. चंदणी साहिल शेख असे या १२ वर्षीय दुर्दैवी मुलीचे नाव आहे. तर ७६ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या शाळेतील इतर विद्याथिनींना देखील या औषधांचा परिणाम होत असल्यामुळे काही विद्यार्थ्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संजय नगरमधील उर्दू माध्यमाच्या पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना औषधे दिली होती. या औषधातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या विषबाधेमुळे चांदणी शेखचा मृत्यू झाला, तर अन्य विद्यार्थ्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना कॅल्शियम, रक्तवाढीची औषधे दिली जात होती. मात्र या औषधांनी विद्यार्थ्यांना उलट्या, जळजळ होऊ लागली. विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यानच्या काळात चांदणीचा मृत्यू झाला. विद्यार्थ्यांना नेमकी कोणती औषधे दिली, या प्रकारात कोणी हलगर्जी केली, याबाबत आता चौकशी होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत .