पुणे : केंद्र सरकारने हडपसरवासियांसाठी रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी 8 कोटी 36 लाख रुपयांची तर पुणे-मिरज-लोंडा रेल्वे मार्गाच्या दुपरीकरणासाठी तब्बल 555 कोटी रुपयांची तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पात केली आहे. नगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे मार्ग नव्याने विकासित करण्यात येमार आहे. त्यासाठीसुद्धा 527 कोटी रुपयांचा तजवीज केली आहे. त्यामुळे पुणे विभागातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळणार असून, विकासाची गती वाढणार आहे, असे स्पष्ट चित्र दिसत आहे.
रेल्वेची लोकल सेवा नागरिकांसाठी गरजेची आहे. पुणे-दौंड, पुणे-दौंड-बारामती, पुणे-फुरसुंगी-जेजुरी अशी पॅसेंजर सुरू केली, तर रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होईल. त्यासाठी हडपसर रेल्वे स्थानकाचा विकास होऊन लवकरात लवकरच प्रवासी लोकल सुरू व्हावी. त्यासाठी हडपसर रेल्वे स्थानकाचा विकास होणेही गरजेचे आहे. शहराबरोबर उपनगर झपाट्याने विकसित होत आहे. पुणे महानगरपालिका देशातील सर्वाधिक मोठी महानगरपालिका म्हणून मानली जात आहे. त्यामुळे उपनगर आणि परिसराच्या दळणवळण यंत्रणेसाठी आता रेल्वेसेवा नागरिकांना अत्यंत गरजेची वाटू लागली आहे.
हडपसर रेल्वे स्थानकासाठी ८ कोटी ३६ लाख रुपयांची तर पुणे – मिरज – लोंडा रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी तब्बल ५५५ कोटी रुपयांची तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. नगर – बीड- परळी वैजनाथ रेल्वे मार्ग नव्याने विकसित करण्यात येणार असून, त्यासाठी ५२७ कोटी रुपयांचीही तरतूद झाली आहे. त्यामुळे पुणे विभागातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळणार आहे.
पुणे स्टेशन रेल्वे स्थानकावरील वाढता ताण लक्षात घेवून, हडपसर रेल्वे स्थानकाचे काम दोन वर्षांपासून सुरू झाले आहे. येत्या दीड वर्षात ते पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी केंद्र सरकारने ८ कोटी ३६ लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे या स्थानकाच्या कामाला वेग येणार आहे. तसेच पुणे रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यासाठीही १३ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे या स्थानकावर आता २४ ते २७ डब्यांची लांब पल्ल्यावर धावणारी रेल्वे वाहतूक करू शकेल. मध्ये रेल्वेच्या पुणे विभागासह सर्व स्थानकांवर प्रवासाची तिकिटे देणारी स्वयंचलित यंत्रणेची (ऑटोमेटिक तिकिट व्हेंडींग मशीन) संख्या वाढविण्यासाठीही ९ कोटी रुपयांची तरतूद झाली आहे.
स्थानकांमध्ये सुधारणा करण्यासाठी ६० कोटी तर, स्थानकांवरील पादचारी पूल, प्लॅटफॉर्म उभारण्यासाठी ८० कोटी आणि स्थानकांचे विकसन खासगी भागीदारीत करण्यासाठी ३१६ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. मुंबई शहर वाहतूक प्रकल्पांसाठी एकूण ६७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात मध्य रेल्वसाठी ७ हजार ७१५ कोटी रुपयांची कामे सुचविण्यात आली आहेत. त्यातील ४ हजार ८३० कोटी रुपये या आर्थिक वर्षातील कामांसाठी केंद्र सरकारने उपलब्ध केले आहेत. वर्धा – नांदेड हा नवा मार्ग सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी ३४७ कोटी रुपये तर, इंदोर- मनमाडसाठी (व्हाया मालेगाव) ९ हजार ५४७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सोलापूर – उस्मानाबाद व्हाया तुळजापूर या ८४ किलोमीटरच्या नव्या मार्गासाठी २० कोटी रुपयांची तरतूद झाली आहे.
लातूरच्या कारखान्यासाठी तरतूद
रेल्वे डब्यांची निर्मिती करण्यासाठी लातूरला कारखाना उभारण्याची घोषणा या पूर्वी झाली होती. त्यासाठी ४५ कोटी रुपयांची तरतूद करून, त्या प्रकल्पाला वेग देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रत्नागिरीला रेल्वे डब्यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठीची कंपनी उभारण्यासाठी यंदा १५ कोटी रुपयांची तरतूद करून पुढचे पाऊल टाकण्यात आले आहे.