गृहिणीच्या घरकामाचे मूल्य अजिबात कमी नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कार्यालयीन काम करणा-या पतीच्या तुलनेत गृहिणीने घरात केलेल्या कामाचे मूल्य अजिबात कमी नाही, असा निर्वाळा दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान दिला आहे. एका अपघाताच्या प्रकरणाच्या सुनावणी करताना दाम्पत्याच्या नातेवाइकांना दिली जाणारी नुकसान भरपाई वाढवून देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती एनव्ही रमण्णा आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत.

दिल्लीत एप्रिल 2019 मध्ये कारच्या धडकेत एका दुचाकीस्वार जोडप्याचा मृत्यू झाला होता. दाम्पत्यांच्या नातेवाइकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईची रक्कम आता 11.20 लाख रुपयांवरून 33.20 लाख रुपये झाली आहे. मे 2014 पासून 9 टक्के वार्षिक व्याजदराने संबंधित इन्शुरन्स कंपनीने ही रक्कम द्यायची आहे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती रमण्णा यांनी या प्रकरणाचा निकाल देताना, सन 2001 मधील लता वाधवा निकालाचा हवाला दिला आहे. या प्रकरणात महिला घरी करत असलेल्या कामाला आधार मानून निकाल दिला होता. या महिलेचा एका समारंभात झालेल्या अग्नितांडवात मृत्यू झाला होता. त्यामुळे तिच्या नातेवाइकांना नुकसान भरपाई दिली होती.

महिलांची दिवसभरात 299 मिनिटे घरकामात जातात

सुनावणीच्यावेळी न्यायालयाकडून सन 2011 च्या जनगणनेनुसार जवळपास 15 कोटी 90 लाख 85 हजार महिला गृहिणी असल्याचे समोर आले आहे. त्या तुलनेत केवळ 57 लाख पुरुष घरगुती कामकाज करतात. भारतातील वेळेचे नियोजन या 2019 मध्ये राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने केलेल्या सर्वेक्षणाचा हवाला दिला आहे. त्यानुसार महिलावर्ग दिवसाची सरासरी 299 मिनिटे (अंदाजे पाच तास) विनामानधन घरगुती कामकाजावर व्यतीत करतात. तर पुरुष केवळ 97 मिनिटे (सुमारे एक तास 37 मिनिटे) घरगुती कामकाजात घालवतात. एकंदरीत विचार करता, महिला दिवसातील सरासरी 16.9 टक्के विना मानधन घरगुती कामांमध्ये घालवतात. तर पुरुष केवळ आपला 2.6 टक्के वेळ देतात, याकडे न्यायालयाने यांनी लक्ष वेधले.