‘आणि म्हणून मी मैदान सोडले’- गावस्कर

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन –‘ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी शिव्या दिल्यामुळेच मी मैदान सोडण्याचा निर्णय घेतला होता’ असा खुलासा भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी केला आहे.  सुनील गावस्कर हे क्रिकेटच्या मैदानात शांत असलेले साऱ्यांनीच पाहिले आहे. परंतु एकदा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात मात्र गावस्कर चिडलेले पाहायला मिळाले.

चुकीचे बाद झाल्यामुळे ते चिडले, असे सर्वांना वाटत होते. परंतु खरे कारण काही वेगळेच होते. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी शिव्या दिल्यामुळेच मी मैदान सोडण्याचा निर्णय घेतला होता, असे गावस्कर यांनी स्पष्ट केले. अथश्री फाऊंडेशन तर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्कार काल पुण्यात देण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

गावस्कर म्हणाले की, “ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात मेलबर्नच्या कसोटी सामन्यात मी खेळत होतो. माझी चांगली फलंदाजी होत होती. त्यावेळी बॅटची कडा लागलेला एक चेंडू माझ्या पॅडवर आदळला. त्यानंतर पंचांनी मला चुकीच्या पद्धतीने बाद दिले. मी काही पावले चालल्यावर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी मला शिव्या दिल्या. त्यामुळेच मी मैदान सोडण्याचा निर्णय घेतला होता,” याउलट चुकीचे बाद झाल्यामुळे ते चिडले, असे सर्वांना वाटत होते. परंतु खरे कारण आता गावस्कर यांनी स्पष्ट केले.

किरमाणी यांच्या विधानामुळे सोडले मैदान

क्रिकेट सामन्यातील त्या प्रसंगाची आठवणही त्यांनी सांगितली. “या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅलन बोर्डर हे तीनदा बाद होते. पण पंचांनी त्यांना बाद दिले नाही. पण एकदा बोर्डर हे त्रिफळाचीत झाल्यावरही पंचांना त्याबद्दल संशय होता. त्यावेळी यष्टीरक्षक सय्यद किरमाणी मला म्हणाले, जर पंचांनी आता बाद दिले नाही तर मी मैदान सोडेन. पण पंचांनी त्यावेळी बाद दिले. पण किरमाणींचे शब्द माझ्या डोक्यामध्ये फिट बसले आणि त्यामुळेत मैदानाबाहेर मी पडलो” असे गावस्कर यांनी सांगितले.