इंदापूर कृती शेतकरी समितीचा इशारा, म्हणाले – ‘उजनीतून पाण्याचा एकही थेंब सोलापूरला जाऊ देणार नाही’

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – उजनी धरणातून इंदापूरला दिलेल्या 5 टीएमसी पाण्याला सोलापूरच्या लोकप्रतिनिंधीनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे सोलापूरलाही उजणी धरणातून पाण्याचा एकही थेंब जाऊ दिला जाणार नाही. सध्या नदीतून दिलेले पाणी देखील बंद पाडण्यात येईल, असा इशारा इंदापूर कृती शेतकरी समितीने दिला आहे. सोलापूरकरांनी आमची खोडी काढली आहे. त्यामुळे आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे सांगत समितीने आमच्या हक्क्याच्या पाण्यासाठी न्यायालयात लढा देणार असल्याचेही म्हटले आहे.

इंदापूर कृती शेतकरी समितीतर्फे इंदापूरात कळस येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील म्हणाले की, उजनीतून इंदापूरच्या अवर्षणग्रस्त भागाला दिले जाणारे पाणी हे आमच्या हक्काचे आहे. त्यास सोलापूरमधून होणारा विरोध हे राजकीय द्वेषापोटी रचलेले षडयंत्र आहे. उजनी धरणामुळे तालुक्यातील विस्थापित झालेल्या लोकांना पाणी मिळत नसल्याची वस्तूस्थिती आहे. मात्र सोलापूरला आँक्टोबरनंतर अनाधिकृतपणे पाणी दिले जाते, ही बाब नियमबाह्य आहे. सध्या सोलापूरला नदीतून दिलेले पाणी बंद पाडण्यात येणार आहे. खडकवासला धरणसाखळीतील पाणी पुण्याच्या वाढत्या पाणी मागणीमुळे आम्हाला पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. परंतू त्यांनी वापरलेल्या पाण्यापैकी सुमारे 80 टक्के सांडपाणी हे भिमा नदीत येत आहे. हेच सांडपाणी आम्ही शेतीसिंचनासाठी मागणी करत आहोत. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाठपुरावा करुन शेटफळगढे उपसा सिंचन योजनेस मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. मात्र जलसंपदा मंत्र्यांनी ही सिंचन योजना रद्द केल्याचे जाहीर केले. हा प्रकार म्हणजे ताटात वाढलेला घास परत घेण्यासारखा असल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.