चिनीनं सामंजस्य कराराचं केलं उल्लंघन : भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पहिल्यांदाच थेट नाव घेत आणि वेळ सांगत चीनमुळेच सीमेवर तणाव (India china tension) असल्याचे सांगितले आहे. चीननेच पँगाँग लेक परिसरात द्विपक्षीय सामंजस्य कराराचे उल्लंघन केले आहे, 29- 30 ऑगस्टच्या रात्री पँगाँग लेकजवळ चिनी सैन्याने घुसखोरी करत सामंजस्य कराराचे उल्लंघन केले, असे केंद्राकडून सांगण्यात आले.

परराष्ट्र मंत्रालयाच्या मतानुसार, ‘द्विपक्षीय चर्चेत दोन्ही बाजूंनी मान्य केलेल्या गोष्टी डावलून चीनने एकतर्फी सैन्य कारवाई केली आहे. सीमेवरची सध्याची परिस्थिती बदलण्याचा चीनकडून प्रयत्न झाला आहे.’ भारत- चीन सीमेवरचा तणाव वाढण्याला चीनच जबाबदार आहे. म्हणून चीनला उत्तर देण्यासाठीच भारताने सोमवारी कारवाई केली. चीनने पुन्हा भारताच्या सीमेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालय प्रवक्त्यांनी भारतावरच आरोप केल्याने भारताकडून बाजू स्पष्ट करण्यात आली आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या ह्यू च्युनईंग यांनी सांगितले की, चीनने कधीच युद्धासाठी कोणत्याही देशाला कसलीच मदत केलेली नाही. तसेच दुसऱ्या देशांच्या सीमेतील एक इंचही जागा बळकावण्याचा प्रयत्न केलेला नाही. चिनी सीमेवरील पथकाने कधीच सीमा ओलांडली नाही. 2 दिवसांपूर्वी चीनने भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त समोर आले होते. 29 ऑगस्टला रात्री उशिरा पैंगोग त्सो झील इथे भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य आमने-सामने आल्याची माहिती मिळाली.

चीनच्या सर्व हालचालींवर भारताची नजर होती. त्यामुळे चीन काहीतरी कुरापती करणार याचा अंदाज असल्यामुळेच ड्रॅगनचा डाव उधळून लावण्यात यश आलं आहे.